महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष शेवटाकडे : असे काय घडले कि , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना सरकार बनविण्याचा ” नाद ” सोडावा लागला….
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या भूकंपाची तीव्रता कमी कमी होत जाऊन अखेर आज पूर्णपणे संपली . शनिवारी पहाटे राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे मनोमिलन झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाचे नेते शरद पवार यांना मोठा धक्का बसला होता. अजित पवार यांच्या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी उलथापालथ झाली. पण हा निर्णय अजित पवार यांनी का घेतला याचा शोध घेतला असता , अखेर त्यांच्या काकू प्रतिभाताई पवार आणि ” सुळे ” बाहेर निघाले. परिणामी कौटुंबिक दबावातून त्यांना शेवटी भाजप बरोबर टाकलेले पाऊल मागे घ्यावे लागले, असे सांगण्यात येत आहे.
हे “सुळे ” म्हणजे सदानंद सुळे . सुप्रिया सुळे यांचे यजमान, शरद पवारांचे जावई, अजित पवार यांचे मेहुणे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भाचे आहेत. म्हणजे त्यांच्या आणि काकू प्रतिभाताई पवार यांच्या शिष्टाईमुळे अजित पवारांनी माघार घेतली. आता भाजपचे देवेंद्र फडणवीस नव्हे तर सदानंद सुळे यांच्या मामाचे चिरंजीव उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत. अर्थात यात नाते प्रकरणाचा संबंध केवळ अजित पवारांना स्वगृही परत आणण्यापुरता मर्यादित होता. तसा राजकारणचा आणि या दोघांचाही काही संबंध नाही.
असे हे सगळे कौटुंबिक नात्याचे राजकारण आहे. या सर्व नातेसंबंधात मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस कि उद्धव ठाकरे असा पेच तर अजित पवारांसमोर होताच पण शेवटी अजित पवारांनी कौटुंबिक एकतेला अधिक महत्व देऊन स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे ” पवार कुटुंबीय ” फुटता फुटता वाचल्याने महाराष्ट्राचे नवे महाभारत होता होता राहिले.
दरम्यान असे सांगण्यात येते कि , राजकीय संन्यास घेण्याच्या अटीवर अजित पवार यांनी सत्ता नाट्यातून माघार घेतली आहे.
चार दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आणि त्यांनी राजीनामा दिला म्हणून बहुमत नाही हे कारण दाखवीत देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषद घेऊन आपल्या राजीनाम्याचा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाने आज २४ तासांच्या आत बहुमत सिध्द करण्यास सांगितले होते. त्यामुळं उद्या होणाऱ्या फ्लोअर टेस्ट आधीच अजित पवार यांनी धक्कादायक निर्णय निर्णय घेतल्यामुळे फडणवीस यांनाही आपल्या पदाचा राजीनामा देऊन सरकार स्थापन करण्याच्या महानाट्यावर पडदा टाकला .
गेल्या चार दिवसांपासून अजित पवारांनीं परत यावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात होते परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश येत नव्हते . मग असे काय घडले कि अजित पवारांना आपला निर्णय बदलावा लागला. पवारांचे मन वळवण्यासाठी घरचा माणूसच कामी आला अशी चर्चा आहे.
त्याचे झाले असे कि , अखेर हि जबाबदारी शरद पवारांचे जावई आणि सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनी आपल्या खांद्यावर घेत सकाळी ८ वाजता हॉटेल ट्रायडंटमध्ये अजित पवारांना भेटायला बोलावले. या दोघांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. त्यानंतरच अजित पवार यांना हा निर्णय घ्यावा लागला. अजित पवारांच्या या निर्णयामुळे पवार घराण्याची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी , पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना आपल्या गोटात वाळवून पवारांवर मोठा घाव केला होता. यामुळे पवारांच्या एकूणच राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते . पण सदानंद सुळे यांनी या सर्व प्रकरणात शिष्टाई केली . त्यानंतर थेट वर्ष बंगल्यावर जाऊन त्यांनी , कुटुंबियांच्या दबावामुळे आपण भाजपला साथ नाही देऊ शकत असे स्पष्ट सांगितल्याने देवेंद्र फडणवीस यांचाही नाईलाज झाला.
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदींनी अमित शहा यांच्याशी महाराष्ट्राबद्दल तासभर चर्चा केली आणि त्यांना या सर्व प्रकारची माहिती दिली . त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आमच्याकडे आले होते म्हणून आम्ही सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता परंतु काही वैयक्तिक कारणामुळे आपण राजीनामा देत असल्याचे ते म्हणाले त्यामुळे आमच्याकडे बहुमत नाही. कोणताही घोडेबाजार आम्ही करू इच्छित नाही . आमची भूमिका स्पष्ट आहे . आता आमच्याकडे बहुमत नाही त्यामुळे मी सुद्धा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.