महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष : सेना – काॅंग्रेस – राष्ट्रवादीकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा
आज सकाळी शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राज भवनात जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करीत १६४ आमदारांच्या सह्यांचं पत्र त्यांनी राज्यपालांना दिलं आहे.
सरकार स्थापन करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे संख्याबळ असल्यानं आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी तात्काळ पाचारण करण्यात यावं, असे त्यांनी पत्राद्वारे सांगितले आहे.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विनायक राऊत, आझमी, केसी. पडवी आणि जयंत पाटील आदी नेते आज सकाळी १० वाजताच्या सुमारास राजभवनात पोहोचले. त्यांनी १६२ आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांना दिले आणि पुरेसे संख्याबळ असल्याने राज्यपालांनी आम्हाला तात्काळ सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रित करावं अशी विनंती केली. देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, त्यांनी यापूर्वी विधानसभा सदस्यांचे पुरेसे संख्याबळ नसल्याने सरकार स्थापण्यास असमर्थता दर्शवली होती. आताही त्यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. आजही त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे ते बहुमत सिद्ध करू शकत नाहीत. ते बहुमत सिद्ध करण्यास असमर्थ ठरल्यानंतर शिवसेना सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहे, असं या पत्रात म्हटलं आहे.