Politics Of Maharashtra : कोण काय म्हणाले ? : आमच्या दृष्टीने मुख्यमंत्रीपद नव्हे स्थिर सरकारला आमचे प्राधान्य : आ. नवाब मलिक
महाराष्ट्रात सरकार बनवल्यानंतर ते पाच टिकले पाहिजे. सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ कसा पूर्ण करणार त्या मुद्दाला आमच्या तिन्ही पक्षांचे पहिले प्राधान्य आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेणार का? प्रश्नावर ते म्हणाले की, “हा मुद्दा आमच्यासाठी महत्वाचा नाही. सरकार पाच वर्ष कसे चालेल तो विषय आमच्यासाठी महत्वाचा आहे. लोकांच्या भावनांचा आदर झाला पाहिजे. लवकरात लवकर सरकार स्थापन करण्याला आमचे पहिले प्राधान्य आहे”.
दरम्यान नवाब मलिक शुक्रवारी रात्री उशिरा किंवा शनिवारी सकाळी सरकार स्थापनेचा दावा करु असे म्हणाले होते. पण पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांकडे कधी जायचे ते उद्या ठरवू असे स्पष्ट केले. त्यामुळे महाविकास आघाडी आज सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता नाही. दरम्यान नेहरु सेंटरमध्ये आज काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीची बैठक झाली.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं यावर सहमती झाली आहे. शरद पवार यांनी बैठकीच्या बाहेर आल्यानंतर ही माहिती दिली . मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव आम्ही पुढे केलं आहे. तिन्ही पक्षांनी यासाठी सहमती दर्शवली आहे. नेतृत्त्व कोणी करायचं हा आमच्या समोरचा अजेंडा नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच उद्या पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे असंही पवार यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान “पहिल्यांदाच आमच्या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची एकत्र चर्चा झाली. बऱ्याच गोष्टीवर आम्ही मार्ग काढला आहे. मला तुम्हाला आता अर्धवट माहिती द्यायची नाही. तुमच्यासमोर येऊ तेव्हा एकही मुद्दा अनुतरित्त ठेवणार नाही. सर्व प्रश्न सोडवून तुमच्यासमोर येऊ. आमची चर्चा योग्य दिशेने सुरु आहे” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
वरळी येथील नेहरू सायन्स सेंटरमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची सुमारे सव्वा दोन तास बैठक चालली. या बैठकीतून सर्वात आधी शरद पवार बाहेर पडले. त्यांनी उद्धव ठाकरे सरकारचे नेतृत्व करतील असे सांगत राज्यातील सत्तापेच सुटल्याचे संकेत देणारी सर्वात मोठी बातमी दिली. पाठोपाठ उद्धव बाहेर आले. त्यांनी सावध पवित्रा घेत मुख्यमंत्रिपदावर प्रतिक्रिया टाळली. आम्हाला एकही मुद्दा अनुत्तरीत ठेवायचा नाही. सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आम्ही तुमच्यापुढे येणार आहोत, असे सांगून उद्धव तिथून निघून गेले. त्यानंतर काही वेळातच पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पत्रकारांना सामोरे गेले. पत्रकारांपुढे म्हणणं मांडण्याआधी पाटील-चव्हाण यांच्यात गुफ्तगू झाले आणि पृथ्वीराज चव्हाणच पत्रकारांशी बोलले.