Politics of Maharashtra : कोण काय म्हणाले ? : राष्ट्रवादी काँग्रेस बिनबुडाचा पक्ष , काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी : प्रकाश आंबेडकर
मुंबईला केंद्रशासित प्रदेश करून विदर्भ वेगळा करण्याचा केंद्र सरकारचा डाव
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तोफ डागली आहे. अकोला येथे पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले कि , राष्ट्रवादी हा पक्ष बिनबुडाचा आहे. तो कोणत्याही बाजूने जाऊ शकतो. काँग्रेसनेही शिवसेनेबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. नाहीतर मुख्यमंत्रिपदासाठी पुढाकार घेतलेल्या शिवसेनेचा पोपट होऊ नये म्हणजे झालं, गेल्या २६ दिवसांपासून राज्यात नाटक सुरू आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सत्ता स्थापनेसाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. सत्तेसाठी महाविकासआघाडी तयार होत आहे. परंतु, यात शिवसेनेचा पोपट होऊ नये एवढीच इच्छा आहे, असा टोला लागवताना त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली.
लोकांमध्ये चीड निर्माण व्हावी असं सध्या राज्यात वातावरण आहे, ३७० रद्द होणार ही कुठेही चर्चा नव्हती ते ताबडतोब करण्यात आले. त्याचप्रमाणे मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याचा केंद्राचा डाव असून वेगळा विदर्भ करण्याची केंद्राची भूमिका असल्याचा आरोपही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केला.
अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटी मदत जाहीर केली होती, राज्यपाल त्याची अंमलबजावणी करणार का? केंद्रसरकार याबाबत राज्यपालाना निर्देश देईल का? असा सवालही आंबेडकर यांनी उपस्थितीत केला.