Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Politics : मोदी-शहा यांना समजून घेण्यासाठी राऊत यांना अनेक जन्म घ्यावे लागतील : आशिष शेलार

Spread the love

‘मोदी आणि शहा यांना समजून घेण्यासाठी राऊत यांना अनेक जन्म घ्यावे लागतील. वयाबरोबर त्यांची परिपक्वता वाढावी, अशा खोचक शब्दांत शेलार यांनी राऊत यांना वाढ दिवसाच्या शुभेच्छा देताना  युतीतील सत्तावाटपाच्या चर्चेबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जे सांगितलं, तेच सत्य आहे. त्यामुळं कुणाची अडचण होत असेल आणि राजकीय स्वार्थापोटी कुणी असत्य पसरवत असेल तर त्याला आमचा नाइलाज आहे,’ अशा शब्दांत भाजपचे आमदार अॅड. आशीष शेलार यांनी शिवसेनेच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

महायुतीच्या सरकारमध्ये समसमान सत्तावाटप करण्याचा निर्णय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व अमित शहा यांच्यात झाला होता. मात्र, शहा यांनी हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवलाच नाही. त्यामुळंच सध्याचा गोंधळ निर्माण झाला,’ असा आरोप शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला होता. भाजपनं आज त्यांच्या या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. पंतप्रधान मोदी यांना अमित शहांनी अंधारात ठेवल्याचा राऊत यांचा आरोप शेलार यांनी खोडून काढला

पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल आम्हाला आदर व प्रेम असल्याचं राऊत यांनी काल म्हटलं होतं. त्यावरही शेलार यांनी टोला लगावला. शिवसेनेचं मोदींबद्दलचं प्रेम स्वार्थी की नि:स्वार्थी हे पाहावं लागेल, असं ते म्हणाले. ‘पूर्वी इतर पक्षाचे लोक ‘मातोश्री’वर राजकीय चर्चा करण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी यायचे. आता सत्तेच्या लालसेपोटी ‘मातोश्री’च्या बाहेर पडून फाइव्ह स्टार हॉटेलच्या वाऱ्या सुरू आहेत. ‘मातोश्री’तून बाहेर पडून आपल्याच कुटुंबातील राज ठाकरे यांना न भेटणारे आता माणिकराव ठाकरेंना भेटण्यासाठी हॉटेलात जात आहेत,’ असा चिमटाही शेलार यांनी काढला.

उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप राऊत यांनी गुरुवारी केला होता. त्याची शेलार यांनी खिल्ली उडवली. ‘मोदी आणि ठाकरे यांच्यात दुरावा कोण निर्माण करतंय हे महाराष्ट्र रोज सकाळी टीव्हीवर पाहतो,’ असं म्हणत शेलार यांनी राऊतांनाच आरोपीच्या उभे केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!