महाराष्ट्राचे राजकारण : उद्धव ठाकरे पुन्हा गरजले , मुख्यमंत्रीही आपला होईल आणि सरकारही आपलेच असेल…
शिवसेना आमदारांशी वार्तालाप करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले कि , ‘आतापर्यंत पालखीचे भोई बनून होतो. आता तसं बनून राहणार नाही. मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत शिवसैनिकालाच बसवणार. महाराष्ट्रात आपलंच सरकार बनणार. शिवसेनेच्या ५६ आमदारांसमोर ते बोलत होते.
राज्यात निर्माण झालेली सत्ताकोंडी फोडण्यासाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी निर्णायक प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला शनिवारी संध्याकाळी सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले. त्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. राज्यपालांच्या आमंत्रणावर निर्णय घेण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरू आहे. तर, शिवसेना आपल्या आमदारांचा कल जाणून घेत आहे.
मालाडच्या मढ येथील हॉटेल ‘रीट्रीट’मध्ये वास्तव्यास असलेल्या आपल्या आमदारांची उद्धव ठाकरे यांनी आज भेट घेतली व त्यांच्याशी संवाद साधला. ‘आमदारांनी कसलीही चिंता करू नये. महाराष्ट्रात आपलंच सरकार येणार आहे आणि मुख्यमंत्रीही आपलाच होणार आहे,’ अशी ग्वाही उद्धव यांनी दिली. ‘तुमच्याशी बोलता यावं म्हणून केवळ सर्वांना एकाच ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. तुमच्यावर अविश्वास दाखवण्याचा अजिबात प्रश्न नाही,’ असा विश्वास उद्धव यांनी आमदारांना दिला. त्याचबरोबर, युती अजून तुटलेली नाही,’ असंही उद्धव यांनी सांगितलं.
दरम्यान राज्यपालांनी दिलेल्या सत्तास्थापनेच्या आमंत्रणावर निर्णय घेण्यासाठी राज्य भाजपनं बोलावलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. सायंकाळी चार वाजता पुन्हा एकदा ही बैठक होणार आहे. त्यात जो निर्णय होईल, त्याची माहिती दिली जाईल,’ असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीनंतर सांगितलं. या बैठकीत विरोधी पक्षात बसण्याबाबतही चर्चा झाली असून त्याबाबत पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनाही कळवण्यात आल्याचं समजतं. या माध्यमातून भाजपनं शिवसेनेला एक प्रकारचा अल्टीमेटम दिल्याचीही चर्चा आहे.