महाराष्ट्राचे राजकारण : सत्ता स्थापनेस भाजपने नकार दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग , सेना-राष्ट्रवादीची काँग्रेसवर नजर
राज्यातील मोठा पक्ष असलेल्या भाजपने राज्याच्या सत्ता स्पर्धेतून माघार घेतल्याने राज्यपालांनी शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकावरील पक्ष म्हणून सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी उद्यापर्यंतची मुदत दिली आहे. राज्यपालांचे हे पत्र राज्याच्या राजकीय वर्तुळात नाट्यमय घडामोडी घडत असून त्यासाठी काँग्रेस -राष्ट्रवादीच्या गोटातील हालचाली वाढल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांशी चर्चा करून सत्तेसाठी लागणाऱ्या आकड्यांची जुळवाजुळव करणार असल्याने राज्यात कुणाचा मुख्यमंत्री बसणार? आणि राज्याच्या राजकारणात कोणती उलथापालथ होणार हे उद्याच कळणार आहे.
राज्यातील ५६ जागा मिळविलेला दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्तास्थापनेचा दावा करण्याचं आमंत्रण दिले आहे . उद्या संध्याकाळी साडे सात वाजेपर्यंत त्यांना पाठिंबा दर्शविणाऱ्या आमदारांच्या यादीसह सत्ता स्थापनेचा दावा करावा लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेने आतापासूनच आकड्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत उद्या दुपारी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते नवी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. राऊत उद्या दुपारी ३ वाजता दिल्लीला जाणार असल्याचं सांगण्यात येतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही सोनिया गांधी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधणार असून शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या सोमवारी सकाळी ९.३० वाजता शिवसेनेच्या आमदारांशी बैठक घेणार आहेत. मढ येथील हॉटेल द रिट्रीटमध्येही बैठक होणार आहे. तर जयपूर येथे सकाळी ११ वाजता काँग्रेसच्या महाराष्ट्रातील सर्व आमदारांची बैठक होणार आहे. त्यानंतर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे हे दिल्लीत जाऊन काही आमदारांसह सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.तर इकडे मुंबईत सकाळी ११ वाजता ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली भाजप नेत्यांची बैठक होणार असून त्यात पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे. भाजपने सत्तेचा दावा सोडला असला तरी शिवसेनेने सत्तेसाठी पाठिंबा मागितल्यास काय भूमिका घ्यायची यावर या बैठकीत चर्चा होणार असून विरोधी पक्षात बसण्यावरही चर्चा करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्यास नकार दिल्यास शिवसेना भाजपकडे पाठिंबा मागू शकते अशीही चर्चा आहे . भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर सत्तेत येण्यासाठी पुरेसा आकडा जुळवण्याकरीता शिवसेनेला दोन्ही काँग्रेसला सोबत घ्यावं लागणार आहे, अन्यथा त्यांना भाजपचा तरी पाठिंबा घ्यावा लागेल. तसे न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे उद्या राज्यात कोणते पक्ष काय भूमिका घेतात यावर महाराष्ट्राची पुढील वाटचाल अवलंबून आहे.