Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्राचे राजकारण : भाजपच्या नाकारानंतर राज्यपालांचे सेनेला उद्या साडेसात वाजेपर्यंत यादीसह येण्याचे आमंत्रण

Spread the love

सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने सत्ता स्थापण्यास नकार दिल्यानंतर राज्यपालांनी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. उद्या सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत शिवसेनेला सत्ता स्थापन करण्याची मुदत देण्यात आल्याने शिवसेनेसमोर  आकड्यांची जुळवाजुळव करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. शिवसेनेकडे स्वतःचे ५६ आमदार आहेत.

कालपासून राज्याच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत असून सत्ता स्थापन करण्यास भाजपाने  असमर्थता दर्शविल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुसरा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिलं आहे. उद्या संध्याकाळी (११ नोव्हेंबर) साडेसात वाजेपर्यंत शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासंदर्भात भूमिका मांडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. मात्र, शिवसेना सत्ता संपादनासाठी बहुमताचा आकडा कसा जुळवणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

सत्ता स्थापनेसंदर्भात भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कोअर कमिटीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात जाऊन भेट घेतली. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी भाजपा सरकार स्थापन करणार नसल्याची स्पष्ट केलं. आम्ही राज्यपालांची भेट घेऊन भाजपा सरकार स्थापन करू शकत नाही, अशी माहिती राज्यपालांना दिल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने आमचा पाठिंबा मागण्याआधी भाजपशी असलेली युती तोडावी आणि एनडीएतून  आधी बाहेर पडावे अशी अट घातली आहे . शिवाय अजून काँग्रेस हायकमांडचा निर्णय व्हायचा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस तयार झाली तरी काँग्रेस तयार होईल का हाही मोठा प्रश्न आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!