Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्राचे राजकारण : शिवसेनेच्या आमदाराला ५० कोटीची ऑफर अन दावा काँग्रेस नेत्याचा….

Spread the love

राज्याच्या सत्ता स्थापनेचा आज अखेरचा दिवस असून भाजपकडून संख्याबळ मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असणार यात वाद नाही दरम्यान शिवसेनेच्या एका आमदाराला फोडण्यासाठी भारतीय जनता पक्षाने ५० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. वडेट्टीवार यांच्या या माहितीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विरोधी पक्ष अधिक सावध झाले आहेत. काँग्रेसच्या काही आमदारांनाही भाजपकडून फोन आले असून त्यांना फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र, आमचे आमदार सुरक्षित असून आमचा कोणताही आमदार फुटणार नसल्याचा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.

इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनीही आपल्याला फोन आल्याची माहिती एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना दिली आहे. आपल्याला काही कार्यकर्त्यांचे फोन आले, काही कार्यकर्ते आपल्या घरीही आले, मात्र मी घरी न थांबता बाहेर निघून गेलो. हे कोण कार्यकर्ते होते आणि ते कशासाठी आले होते, याचा अंदाज सर्वांनाच आहे, असे सांगत भाजपने आपल्याला वळवण्यासाठी प्रयत्न केल्याचे खोसकर यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले. दरम्यान भारतीय जनता पक्षाकडून जर कोणत्याही आमदाराला फोडण्यासाठी फोन आले, तर ते सर्व फोन टॅप करावेत, त्याच्याविरोधात पुरावे गोळा करावेत आणि त्यांना उघडे पाडावे, अशा सूचना आम्ही सर्व आमदारांना दिल्या असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. आमचे आमदार राज्यातच सुरक्षित असून कुणालाही जयपूरला पाठवले नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले. जे आमदार जयपूरला गेले असतील, ते व्यक्तीगतरित्या आपल्या कुटुंबीयांसोबत फिरायला गेले असतील. निवडणुकीच्या काळात सर्वजण थकले असल्याने ते फिरण्यासाठी गेले असावेत असे वडेट्टीवार म्हणाले.

भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीपूर्वीच फोडाफोडीचे राजकारण सुरू केल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. मात्र, आमचा कोणताही आमदार फुटणार नाही असे सांगताना, जर कुणी फुटलेच, तर त्याच्यापुढे आम्ही सर्वांच्यावतीने कॉमन उमेदवार उभा करून फुटलेल्या आमदाराला पाडू आणि त्याला राजकारणातूनच हद्दपार करू,असे आम्ही विरोधी पक्षांनी ठरवले असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. राज्यातील जनतेने भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त जागा दिल्या असल्याचे सांगत भाजप सत्ता का स्थापन करत नाही, असा सवाल वडेट्टीवारांनी केला. राज्यात जर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली, तर या स्थितीला भाजपच जबाबदार असेल असेही ते म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!