Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अभिव्यक्ती : महाराष्ट्रातील भाजप -सेनेचा सत्ता संघर्ष , आधुनिक “पितामह भीष्म ” आणि मोदी -गडकरींची एंट्री ….

Spread the love

महाराष्ट्रातील भाजप -सेना महायुतीतील सत्ता संघर्ष टिपेला पोहोचला आहे. या सत्ता संघर्षाच्या  आधुनिक महाभारतात पितामह भीष्मची भूमिका पार पडण्याची जबाबदारी संजयने लीलया शरदचंद्र पवार यांच्यावर टाकली आहे खरी पण त्यांना हे उघडपणे सांगायचे नाही. कारण पवारांच्या मते त्यांच्याकडे या युद्धात प्रत्यक्ष लढण्यासाठी ” आकडे ” नाहीत . याच आकड्यांची जुळवाजुळव करून भाजपला महाराष्ट्राच्या सत्तेतून बाहेर फेकण्याची “भीष्म प्रतिज्ञा”  करून पवारांनी दिल्लीवर स्वारी केली खरी पण त्यातून सध्या तरी काहीही निष्पन्न झालेले नाही.

दरम्यान काल दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांच्याशी सल्ला मसलत केल्यानंतर  महाराष्ट्राचे ज्यष्ठ नेते नितीन गडकरी  यांच्याशी सल्ला मसलत केली त्यानंतर सांगण्यात आले कि , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही ते चर्चा करणार असून महाराष्ट्राच्या राजकारणात आता स्वतः नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात नवा ट्विस्ट येणार आहे हे मात्र नक्की.

काल दिवसभराच्या करवायानंतर महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या या महाभारतात मित्र पक्ष म्हणून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची मदत घेण्याचा प्रयत्न केला खरा पण टाईम्स ऑफ इंडियाने रात्री उशिरा दिलेल्या वृत्तानुसार सोनिया गांधी यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे पण राष्ट्रवादीचे पितामह भीष्म शरद पवार या बाबतीतही प्रचंड आशावादी आहेत कारण ते राष्ट्रवादी आहेत. म्हणूनच त्यांनी सोनिया गांधी यांना ” फार मिलेंगे ” चा वायदा केला आहे.

सोनिया गांधी यांना “फिर मिलेंगे ” हा वायदा निभावण्याची पवारांचा प्लॅन बी असा आहे कि , शिवसेनेने राष्ट्रवादीकडे थेट पाठिंब्याचा जाहीर प्रस्ताव दिल्यास ते सोनिया गांधी यांचा शिवसेना -राष्ट्रवादीच्या सरकारला काही अटी -शर्तीवर बाहेरून पाठिंबा मिळवू शकतील. त्यात शिवसेनचा मुख्यमंत्री असेल , राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री असेल आणि काँग्रेस त्यांच्यावर बाहेरून तांदूळ टाकेल . पण मोठा प्रश्न हा आहे कि , शिवसेना, राष्ट्रवादीकडे अधिकृत आणि उघडपणे सरकार बनविण्यासाठी पाठिंबा मागेल का ? आणि मागितलाच तर काँग्रेस शिवसेना -राष्ट्रवादी सरकारला बाहेरून पाठिंबा देण्यास तयार होईल का?  कारण जे त्यांना हवे ते भाजप देणार असेल तर त्यांच्या दृष्टीने ” बार्गेनिंग” चा विषय निकालात निघणार आहे . पण आता अधिक ताणून धरण्यास सेनेकडे पुरेसा वेळ राहिलेला नाही . कारण सरकार बनविण्याची तारीख आणि वेळ जवळ -जवळ येत आहे.

आता भाजपच्या गोटात काय चालले आहे याचा कानोसा घेतला असता कालच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा -गडकरींच्या भेटीत अमित शहा यांनी पूर्णतः देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केली असून त्यांनी शिवेसेनेवरच युती धर्माचे पालन न केल्याचा गंभीर आरोप करीत ” शिवसेनेशी आता कोणतीही तडजोड नाही ” अशी ताठर भूमिका घेतली आहे.  आता जे काही बोलायचे ते उद्धव ठाकरे यांनी बोलावे भाजप किंवा भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या आरोपांवर कुठलीही प्रतिक्रिया देणार नाहीत अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे आणि नवे सरकार लवकरच बनेल असे रोख -ठोकपणे सांगितले आहे. त्यांच्या या बोलण्यानुसार  शिवसेना सोबत आली नाही तरी ते आपल्या १२ ते १४ मंत्र्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असे सांगण्यात येत आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!