Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

व्हॉट्सअॅपवरील हेरगिरीवरून सोनिया गांधी यांचीही मोदी सरकारवर टीका , आर्थिक धोरणांविरुद्ध काँग्रेसचे देशभर आंदोलन

Spread the love

सध्या देशात व्हाट्सअपच्या हेरगिरीवरून वादंग उठले असून या वादातून काँग्रेस नेत्या  सोनिया गांधी यांनीही  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘मोदी सरकारनेच इस्रायलच्या ‘पिगॅसस’ सॉफ्टवेअरद्वारे सर्वांची हेरगिरी केली आहे. असं करणं असंविधानिक आहेच, शिवाय लज्जास्पदही आहे,’ अशा शब्दात सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

काँग्रेस नेत्यांच्या बैठकीला संबोधित करताना सोनिया गांधी यांनी व्हॉट्सअॅपवरील हेरगिरीवरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या कि , ‘देशात अनेक मुद्दे आहेत. ते तुम्हाला माहीतही आहे. पण मोदी सरकारने इस्रायलकडून पिगॅसेस नावाचं एक सॉफ्टवेअर घेतलं. त्यावरून कार्यकर्ते, पत्रकार आणि राजकारण्यांवर पाळत ठेवण्यात आली. हा प्रकार केवळ अंसविधानिकच नव्हे तर लज्जास्पदही आहे,’ असं सोनिया गांधी म्हणाल्या. या बैठकीत मोदी सरकारविरोधात करण्यात येणाऱ्या आंदोलनाची रुपरेषा ठरवण्यावर चर्चा करण्यात आली. येत्या ५ नोव्हेंबरपासून ते १५ नोव्हेंबरपर्यंत मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात देशभर काँग्रेस निदर्शने करणार आहे.

आरोप प्रत्यारोप…

दरम्यान, सोनिया गांधी यांच्या या टीकेला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘सरकारने या प्रकरणी खुलासा केला आहे. जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, तेव्हा १०,जनपथवरून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कोणी हेरगिरी केली होती? हे सोनिया गांधी यांनी आधी स्पष्ट करावं. त्याशिवाय तत्कालीन लष्कर प्रमुख व्ही. के. सिंह यांच्यावरील हेरगिरीमागे कुणाचा हात होता? हे सुद्धा त्यांनी स्पष्ट करायला हवं’, असं भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सांगितलं. दरम्यान, व्हॉट्सअॅपवरील या हेरगिरी प्रकरणावरून काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी त्यांच्या ट्विटरवरून भाजपवर टीका केली आहे. ‘पिगॅसेस सॉफ्टवेअरचा वापर करणाऱ्या एनएसओ ग्रुपबरोबर काम करत नसल्याचं केंद्र सरकार सांगत आहे. मात्र एनएसओ ग्रुपने सरकारी यंत्रणांसोबत काम करत असल्याचं स्पष्ट केलंय,’ असं चिदंबरम म्हणाले.

‘एनएसओ’ने विकसित केलेल्या हेरगिरी करणाऱ्या ‘पिगॅसस’ या सॉफ्टवेअरचा वापर करीत भारतातील सुमारे १४०० पत्रकार, वकील, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाळत ठेवण्यात आल्याचे उघड झाले आहे. नेमके किती जणांचे मोबाइल फोन हॅक झाले याचा आकडा व्हॉट्सअॅपने सांगितलेला नाही. पण, कोणाकोणाचे फोन हॅक झालेले आहेत त्याचा तपशील कंपनीकडे असून, हेरगिरीला बळी पडलेल्यांशी व्हॉट्सअॅपने संपर्क साधला आहे. हा आकडा छोटा नसल्याचेही कंपनीच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!