महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत आलेल्या पोस्टवर ‘नायक ‘ अनिल कपूरने दिले हे उत्तर
२००१ साली प्रदर्शित झालेल्या ‘नायक’ या चित्रपटात अनिल कपूर एका पत्रकाराच्या भूमिकेत असतो. पण मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतल्यानंतर त्याला आव्हान म्हणून एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याची संधी दिली जाते . त्या एका दिवसात तो ज्या कल्पकतेने आणि तत्परतेने लोकांची कामे करतो ती तडप सिनेरसिकांना चांगलीच आवडली आहे. त्याचाच परिणाम म्हणून आजही अनिल कपूर लोकांच्या मनात आहे . महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावरून जे काही चालले आहे त्यावर नेटकऱ्यांनी म्हटले आहे कि , जोपर्यंत मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत अनिल कपूर यांना मुख्यमंत्री बनवून पाहुयात.
विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आठवडा उलटला तरी राज्यातील सत्तास्थापनाच्या वाटाघाटी मात्र अद्यापही पूर्ण होताना दिसत नाही. भाजप आणि शिवसेनेमध्ये सध्या मुख्यमंत्रिपद आणि महत्त्वाच्या खात्यांवरून वाद सुरू आहेत. शिवसेनेकडून अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाची मागणीही करण्यात येत आहे. अशातच सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या कल्पकतेला उधाण आलं आहे. जोपर्यंत हे दोन पक्ष मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेणार, तोपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून अभिनेता अनिल कपूरची नियुक्ती करा, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय. यामागचं कारण म्हणजे अनिल कपूर ‘नायक’ या चित्रपटात एक दिवसाचा मुख्यमंत्री झाला होता.
विशेष म्हणजे, नेटकऱ्यांच्या या मागणीवर अनिल कपूर यांनी उत्तर दिलं आहे. ‘मै नायक हीं ठीक हूँ’, म्हणत अनिल कपूरने अभिनेता म्हणूनच आनंदी असल्याचं म्हटलंय. अनिल कपूर यांच्या या उत्तराचंही अनेकांनी कौतुक केलं आहे. तर काहींनी ‘नायक’च्या सिक्वलची इच्छा व्यक्त केली आहे.