महाराष्ट्राचे राजकारण : राजकारणात कुणीच कोणाचा कायमचा मित्र आणि शत्रू नसतो, अजित पवारांच्या विधानाची महाराष्ट्रात चर्चा
राज्यात सुरु असलेल्या सत्ता स्थापनेच्या गोंधळात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी, सध्या तरी आम्ही विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र राजकारणात कुणीच कोणाचा कायमचा मित्र आणि शत्रू नसतो, असे विधान केल्यामुळे नाही नाही म्हणताना राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेबरोबर जाणार का ? अशी चर्चा सुरु झाली आहे. तर काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादीनेही शिवसेनेसोबत जाण्याचे संकेत दिल्याने भाजपची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अजित पवार पुढे म्हणाले कि , कोल्हापुरात भाजपला पूरपरिस्थिती नीट हाताळता आली नाही. त्यामुळे कोल्हापूर भाजपमुक्त झाला आहे . बारामतीकरांचं आणि आमचं नातं महाराष्ट्रातील नेत्यांना अद्यापही कळलेलं नाही. बारामतीकरांचं आणि आमचं नातं कुटुंबाचं आहे. अनेक लाटा आल्या आणि गेल्या पण बारामतीकरांनी आम्हाला कधीच अंतर पडू दिलं नाही, असं सांगतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत सभा घेऊन मोठमोठ्या वल्गना केल्या. ढाण्या वाघ दिल्याचंही त्यांनी सांगितलं. पण त्यांना बारामतीतले अंडर करंट्स कळले नाहीत. तरीही मी एक लाखाच्या मताधिक्याने निवडून येईल, असा मला विश्वास होता. मात्र बारामतीकरांनी अपेक्षेपेक्षा अधिक मतदान करून विजयी केलं.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही एवढी प्रचंड मतं मिळाल्यानं बारामतीसाठी खूप कामं करावी लागणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे बारामतीकरांच्या विश्वासाला पात्र होईल, अशी कामं मी करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. शिवसेनेचे नेते विजय शिवतारे हे घमेंडीत होते. त्यामुळे ते शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर वैयक्तिक टीका करत होते. आपण कोण आहोत, कुणावर टीका करतोय, याचं भान असायला हवं. एवढी घमेंड बरी नसते. राजकारणात मतभेद असतात, पण कुठपर्यंत टीका करायची याच्या काही मर्यादा असतात. आपण सुसंस्कृत महाराष्ट्रात राहतो. त्याचे भान ठेवायला हवे. पण ते ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे आम्ही त्यांना पाडण्याचा निर्णय घेतला. पुरंदरमध्ये बंडखोरी होणार नाही, याची काळजी घेतली आणि पुरंदरच्या मतदारांनी साथ दिली. त्यामुळे शिवतारे यांचा पराभव झाला. त्याबद्दल पुरंदरच्या जनतेचं आभारचं, असं ते म्हणाले.