महाराष्ट्राचे राजकारण : एकनाथ खडसेंची खडखड कि आगपाखड !!
राज्याच्या विधासभा निवडणुकांचे निकाल लागले तसे अनेक नेत्यांचे आणि पक्षांचेही निकाल लागले पण अनेक नेत्याच्या चर्चेचा रवंथ चालूच आहे. मग नारायण राणे असोत कि भाजपचे तिकीट नाकारलेले नेते एकनाथ खडसे असोत. पुलावरून आणि पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले तरीही खडसेंची खडखड अद्याप चालूच आहे .
खडसे यांना तिकीट नाकारून पक्षाने त्याच्या मुलीला एका हाताने तिकीट दिले आणि खडसे म्हणतात दुसऱ्या हाताने पाडले . या अपयशाचे खापर खडसे भाजपच्या स्थानिक नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर फोडतात . आपल्यावर अन्याय झाल्याची खडसेंची भावना दृढ आहे पण कोणताही वरिष्ठ नेता त्यांच्याकडे लक्ष दयायला तयार नाही आपले सरकार कसे बनवावे य विवंचनेत ते आहेत.
२०१४ मध्ये खडसेंच्या या कामी मोठा पुढाकार होता पण हा काळाचा महिमा असतो हे खडसेंचे मन मानायला तयार नाही. खडसेंना आशा आहे कि काहीही झाले तरी पक्ष त्यांना सामावून घेईल माणसानं आशावादी असावं तर खडसेंसारखं . ते म्हणतात , ‘भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांना न्याय मिळतो. दत्तक व सावत्र पुत्रांना न्याय मिळतो, मग मी तर पक्षातच जन्माला आलोय. १९८० पासून पक्षाच्या स्थापनेपासून काम करतोय. इथंच लहानाचा मोठा झालो. त्यामुळं पक्ष मला दूर लोटणार नाही. नक्कीच न्याय देईल.
विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगरमधून खडसे यांना तिकीट नाकारून त्यांच्या कन्या रोहिणी यांना भाजपनं उमेदवारी दिली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला. गेल्या ३० वर्षांपासून मतदारसंघ ताब्यात ठेवणाऱ्या खडसे यांना हा मोठाच धक्का आहे . पक्षानं माझं ऐकलं नाही अशी भावना त्यांनी पराभवानंतर व्यक्त केली होती. सोमवारी माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत गप्पा मारताना त्यांनी पुन्हा एकदा मनमोकळेपणानं आपल्या भावना बोलून दाखवल्या. ‘मला माझ्या पक्षाकडून अजूनही आशा आहे, असं ते म्हणाले.
भाजप-शिवसेनेमध्ये सध्या मुख्यमंत्रिपदासाठी सुरू असलेल्या संघर्षावरही त्यांनी भाष्य केलं. ‘देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील. पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच तसं स्पष्ट केलं आहे. त्यामुळं अगोदर ठरलं आहे तसंच होईल. नितीन गडकरी मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’ असं ते म्हणाले.
आता खडसेंना आत्मचरित्र लिहायचं आहे . खार तर पक्षाने फार लवकर हि वेळ त्यांच्यावर आणली कारण सामान्यतः राजकीय सेवानिवृत्तीनंतर नेते आत्मचरित्र लिहितात पण खडसे हि प्रथा मोडण्याच्या तयारीत आहेत. विद्यमान विधानसभेत आपण नसल्याची त्यांची खंत आहे . बरे माणसाला राजकीय हाव तरी किती असावी पक्षाने त्यांना नव्हे तर त्याच्या कन्येला तिकीट दिले शिवाय सुनबाई खासदार आहेत. सगळी महत्वाची पदे एकाच व्यक्तीच्या घरात असतील तर मग कार्यकर्त्यांनी करायचे काय ? हा प्रश्नही सगळीकडे सारखाच आहे.
खडसे म्हणतात ‘सध्या माझ्याकडे भरपूर वेळ आहे. माझी इच्छा आहे की काहीतरी लिहिलं पाहिजे. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या समोर आलेल्या नाहीत. सुरेश जैन माझे कट्टर विरोधक असतानाही ते मुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्यांना मुंबईला घेऊन गेलो होतो. हे फक्त गडकरींना माहीत आहे. राज्याच्या राजकारणावर त्या-त्या वेळी परिणाम करणारे असे अनेक किस्से माझ्याकडे आहेत. त्यावर एक उत्तम पुस्तक होऊ शकेल, असं सांगून, पुढील काळात आपण आत्मचरित्र लिहिणार असल्याचे संकेत खडसे यांनी दिले.