आधी लगीन हरयाणाचे आणि मग महाराष्ट्राचे … शहांनी जुळविले सूत्र मुख्यमंत्री भाजपचा तर उपमुख्यमंत्री जेजेपीचा
महाराष्ट्र आणि हरयाणातील निकालानंतर निर्माण झालेल्या तिढ्यापैकी आधी हरयानाला प्राधान्य देऊन अमित शहा यांनी हरयाणातील सत्ता स्थापनेचा तिढा सोडवला आहे. या सूत्रानुसार भाजपा – जननायक जनता पार्टीचे सरकार सत्तेत येणार असल्याचे स्पष्ट झालेअसून सरकार स्थापनेसाठी अखेर भाजपाला जननायक जनता पार्टीने पाठिंबा दिला आहे.
‘जेजेपी’ चे प्रमुख दुष्यंत चौटाला यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर पत्रकारपरिषदेत भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकारपरिषदेत हरयाणात भाजपाचा मुख्यमंत्री तर जेजेपीचा उपमुख्यमंत्री असेल असे सांगितले आहे. अमित शाह यांच्या या माहितीनंतर मनोहरलाल खट्टर पुन्हा एकदा मुख्यमंत्री तर जेजेपीचे दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले आहे.
अमित शहा यांच्या शिष्टाईमुळे हरयाणामधील सत्तेचा सस्पेन्स अखेर संपला आहे. हरयाणात भाजपने जननायक जनता पार्टी (जेजेपी)शी हात मिळवणी केल्याने राज्यात बीजेपी-जेजेपीचं सरकार स्थापन्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जेजेपीला उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार असून मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहणार असल्याची घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली.
जेजेपीचे नेते दुष्यंत चौटाला यांनी आज संध्याकाळी अमित शहा यांची भेट घेऊन दीर्घ चर्चा केली. या भेटीत युतीचा फॉर्म्युला ठरवण्यात आला. त्यानंतर शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन या युतीची घोषणा केली. अपक्ष आमदारांनीही भाजपला पाठिंबा दिल्याचं शहा यांनी यावेळी स्पष्ट केलं. शनिवारी विधीमंडळ पक्षाचा नेता निवडल्यानंतर कुणाला मंत्रीपद द्यायचं याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचही सांगण्यात आलं. तर हरयाणात मजबूत आणि स्थिर सरकार देण्यासाठीच आम्ही भाजपला पाठिंबा दिल्याचं दृष्यंत यांनी स्पष्ट केलं.
शहा यांच्या घोषणेनंतर मनोहरलाल खट्टर यांच्याकडेच पुन्हा मुख्यमंत्रीपद सोपविण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र जेजेपीकडून दुष्यंत चौटाला हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं निश्चित झालं आहे. जेजेपीच्या पाठिंब्यानंतर हरयाणा विधानसभेत भाजप युतीची संख्या ५९ वर पोहचेल. हा आकडा बहुमतापेक्षा अधिक आहे. हरयाणातील चुरशीच्या निवडणुकीत भाजपने ४०, काँग्रेसने ३१, दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षाने १० जागा जिंकल्या.
सात अपक्ष आणि हरयाणा लोकहित पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय लोकदलाने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ४७ जागा जिंकल्या होत्या. पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत हरयाणातील सर्व दहाही जागा जिंकणाऱ्या भाजपची मतांची टक्केवारी ५८ टक्क्यांवरून थेट ३६ टक्क्यांवर गडगडली. त्या वेळी विधानसभेतील ९० पैकी ७९ मतदारसंघांमध्ये भाजपने आघाडी घेतली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ७५ जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने निश्चित केले होते; पण लोकसभेतील ७९ जागांच्या तुलनेत भाजपला जेमतेम ४० जागाच जिंकणे शक्य झाले.