महाराष्ट्र विधानसभा २०१९ : प्रकाश आंबेडकर यांची भाजप-सेनेबरोबर काँग्रेस-राष्ट्रवादीवरही टीका, मोदींच्या दौऱ्याची उडवली खिल्ली
वंचित बहुजन आघडीचे नेते प्रकाश आंबेडकर आज नगरच्या दौऱ्यावर होते. आपल्या भाषणात त्यांनी भाजप-सेनेबरोबर , काँग्रेस -राष्ट्रवादीवर टीका करीत , मोदींच्या प्रचारदौऱ्याचीही खिल्ली उडवली. ते म्हणाले कि , भाजपला सत्ता राबवता येत नाही. भाजपचा घोडा सध्या उधळला आहे. त्याला लगाम घालण्यास दोन्ही काँग्रेस अपयशी ठरली आहे. भाजपच्या या उधळलेल्या घोड्याला वंचित बहुजन आघाडीच लगाम घालून वठणीवर आणेल, अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी येथे केली.
आंबेडकर शेवगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किसन चव्हाण यांच्या प्रचारासाठी आले असताना त्यांनी भाजपबरोबर दोन्ही काँग्रेसवर घणाघाती टीका केली. महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या काँग्रेसने स्वत:ला वाचवण्यासाठी भाजप-शिवसेनेशी युती करून महात्मा गांधींच्या विचारांशी प्रतारणा केल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. आतापर्यंत तुम्ही प्रस्थापितांना सत्ता दिली, एकदा विस्थापितांना संधी द्या, असं आवाहनही त्यांनी मतदारांना केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार दौऱ्याचीही प्रकाश आंबेडकर यांनी खिल्ली उडवली. पंतप्रधान मोदी सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असून त्यांच्या दौऱ्यामुळे आता आकाशातही वाहतुक कोंडी होऊ लागली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी दरम्यान आघाडी झाली असली तरी राष्ट्रवादीकडून पाडापाडीचं राजकारण सुरू आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला पाडण्यासाठी राष्ट्रवादीवाले विरोधी उमेदवारांना मदत करत असल्याचा दावाही आंबेडकरांनी केला. राष्ट्रवादीने त्यांच्या जाहीरनाम्यात सर्वांना मोफत शिक्षण देण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र सर्वांना मोफत शिक्षण दिल्यास त्यांच्याच ताब्यातील शिक्षण संस्थांचे काय होईल, याची त्यांनाच भीती निर्माण झाल्याचं ते म्हणाले.
भाजपला सत्ता राबवता येत नाही. केवळ धर्माचा आधार घेत ते राज्य चालवत आहेत. देशाचे अर्थकारण बिघडले आहे. स्वत:च्या फायद्यासाठी त्यांनी अनेक बँका बुडविल्या असून येत्या पाच वर्षात आणखी पाच बँका बुडणार असल्याचा दावाही त्यांनी केला.