Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Vidhansabha 2019 : मोदींनी सत्तेवर येताच गरिबांच्या योजना बंद केल्या, राहुल गांधी यांचा हल्ला बोल

Spread the love

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वर्ध्यातील प्रचारसभेत पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या आणि कोलमडलेली अर्थव्यवस्था या देशातील सर्वात मोठ्या समस्या आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर एक चकार शब्दही काढत नाहीत. सत्तेत येताच मोदींनी गरिबांसाठी असलेल्या सर्व योजना बंद केल्या, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

यवतमाळ येथील प्रचारसभेत राहुल गांधी यांनी मोदी आणि भाजपवर निशाणा साधला होता. त्यानंतर त्यांनी वर्ध्यातही सभा झाली. या सभेत त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी आणि अर्थव्यवस्था, देशातील जनतेसाठी सुरू असलेल्या योजना आदींवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर हल्ला चढवला. ‘यूपीए सरकारने आणलेल्या मनरेगा योजनेमुळं गरिबांना मदत झाली. देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचं काम केलं. मात्र, भाजप आणि नरेंद्र मोदींनी या योजनेला विरोध केला. मोदी जसे सत्तेत आले तशा त्यांनी गरिबांसाठी सुरू केलेल्या सर्व योजनांमध्ये बदल केला,’ असा आरोप राहुल यांनी केला.

केंद्र सरकारने लागू केलेल्या जीएसटी योजनेवरूनही त्यांनी टीकास्त्र सोडले. जीएसटी लागू केल्यानं एकापाठोपाठ एक उद्योग बंद होत गेले. त्यामुळं देशातील तरूण बेरोजगार होत आहे. देशातील युवक, शेतकरी, छोट्या व्यापाऱ्यांना यामुळं कोणताच मार्ग दिसत नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या आणि कोलमडलेली अर्थव्यवस्था या देशातील सर्वात मोठ्या समस्या आहेत. पण पंतप्रधान मोदी त्यावर काहीच बोलत नाहीत. देशात गेल्या ७० वर्षांत काहीच झालं नाही, असं मोदी सांगत सुटले आहेत. हा देशवासियांचा अपमान आहे. येथील लोकांनी आपले घाम गाळून देशाची उभारणी केली आहे आणि हे तुमचेच पैसे लुटत आहेत, असे राहुल म्हणाले.

देश उभारणीचं काम शेतकरी, मजूर आणि तरुणांचे आहे हे मला ठाऊक आहे. त्यामुळेच मी त्यांच्याबद्दल बोलत असतो. देशात उद्योगपतींनाही स्थान द्यावं, पण याचा अर्थ असा नाही की सगळंच त्यांच्या हवाली करण्यात यावं, असं म्हणत त्यांनी भाजप सरकारवर तोफ डागली. हे लोक तुमच्यात फूट पाडण्याचं काम करत आहेत. तुमचे पैसे चोरण्याचे काम करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

तत्पूर्वी, यवतमाळमधील सभेतही राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला होता. गेल्या निवडणुकांमध्ये त्यांनी प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. पण त्यांनी आश्वासन पाळले का? असा सवाल विचारतानाच, मोदी ज्या ठिकाणी जातात, तिथे खोटे बोलतात, असा घणाघात राहुल यांनी केला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!