Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतोय आणि अमित शहा ३७० वर बोलताहेत, राज ठाकरे यांची घणाघाती टीका

Spread the love

मुंबईच्या प्रचाराचा आज दुसरा दिवसही मनसे नेते राज ठाकरे यांनी गाजवला . भाजप विरोध हा त्यांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा आहे. आजच्या भाषणात राज म्हणाले कि , टोलमुक्त महाराष्ट्र करू असं भाजपनं आपल्या जाहीरनाम्यात आश्वासन दिलं होतं. कुठं झाला महाराष्ट्र टोलमुक्त?, राज्यात जे ७८ टोल बंद झाले ते फक्त मनसेने केलेल्या आंदोलनामुळे आणि दणक्यामुळे बंद झाले, असे सांगत मुंबईत त्रिभाषासूत्र ठीक आहे. पण मुंबईत चौथी भाषा आणायचा प्रयत्न कराल तर बांबू बसेल असंही त्यांनी सांगितलं.

मुंबईत, मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषा ठीक आहे. पण चौथी भाषा कुणी आणत असेल तर त्यांना बांबूचे फटके दिले जातील, असे राज ठाकरे यांनी आज भांडूपमधील सभेत सांगितले. विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरलेल्या मनसेने प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. पुण्यातील सभा रद्द झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत पहिली सभा झाली. पहिल्याच सभेच राज यांनी सत्ता मागण्याऐवजी राज्याला प्रबळ विरोधी पक्ष नेत्यांची गरज असून तुम्ही मनसेला प्रबळ विरोधी पक्ष बनवा, असे आवाहन मतदारांना केले होते.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईतल्या भांडूपमध्ये सभा घेऊन सरकारवर सडकून टीका केली. नेते येतात, आश्वासन देतात आणि जातात पुढे त्याचं काहीही होत नाही लोकांना कायम गृहित धरलं जातं अशी टीका त्यांनी केली. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रात येऊन शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावर बोलावं अशी अपेक्षा आहे. मात्र ते शेतकऱ्यांवर न बोलता काश्मीरवर बोलून दिशाभूल करताहेत असा आरोपही त्यांनी केला. लोकांनी आश्वासनांबाबत सत्ताधाऱ्यांना जाब विचारला पाहिजे असंही ते म्हणाले. लोकांच्या संवेदना मेल्या असून लोकांना रागच येत नाही असंही ते म्हणाले. मनसेने हाती घेतलेली सर्व आंदोलने पूर्ण केलीत. मनसेमुळेच टोल बंद झाला असा दावाही त्यांनी केला. लोकांनी आमदार आणि खासदारांना प्रश्न विचारले पाहिजे असं आवाहनही त्यांनी केलं. सरकारवर अंकुश ठेवायला विरोधी पक्ष हवाय. आज असा विरोधीपक्ष नाही. त्यामुळे मनसेला विरोधी पक्ष बनवा असा खुलासाही त्यांनी केला. लोक टीका करत आहेत त्यांना करू द्या असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राज ठाकरे पुढे म्हणाले, प्रत्येक निवडणुकीत नागरिकांच्या आयुष्यातील ५ वर्ष जातात, निवडणुकीत वाट्टेल ती आश्वासनं दिली जातात आणि पुढे लोकं विसरतात, आणि लोकं पण प्रश्न विचारत नाहीत आणि इतर कुणीही  सत्ताधाऱ्यांना एकही प्रश्न विचारायला तयार नाहीत की काय केलंत त्या आश्वासनांचं? गेल्या ५ वर्षात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली पण सरकारला त्याचं काही नाही, अमित शाह  एका सभेत बोलत होते आणि त्या सभेच्या शेजारच्या गावात त्याच वेळेला एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आणि अमित शाह बोलत होते कलम ३७० बद्दल होते.

महापालिकेच्या शाळांतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या नोकरीत प्राधान्य हे आश्वासन होतं, काय झालं त्या आश्वासनाच? आधुनिक तंत्र वापरून खड्ड्यांचा प्रश्न कायमचा निकालात काढणार? कुठे गेलं तंत्रज्ञान? खड्डे पडत आहेत, कंत्राटदार कमवतोय, तरीही आपण प्रश्न विचारत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र राज्याला कर्जबाजारी केलं, शेतकऱ्यांच्यात निराशा पसरली आहे असं भाजपने २०१४ च्या जाहीरनाम्यात म्हणलं होतं.काय वेगळं घडलं, महाराष्ट्राच्या डोक्यावरचं कर्ज वाढलं आहे, शेतकरी निराश आहे, तो आत्महत्या करतोय, काय बदल झाला?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदी आणल्यानंतर मी धोक्याची सूचना दिली होती मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. आज ते सर्व धोके खरे ठरत आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. आणि अशा वेळेस सरकारला प्रश्न विचारायचा कोणी? असा हतबल महाराष्ट्र मी नाही बघू शकत? अटकेपार झेंडा नेणारा महाराष्ट्र आज गलितगात्र पडलाय, थंड झालाय. महाराष्ट्राला आसपासच्या घटनांचा राग का येत नाहीये? चीड का येत नाहीये कोणाला? असा सवालही त्यांनी केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!