महाराष्ट्र विधानसभा २०१९ : एमआयएमच्या उमेद्वारांची सहावी यादी जाहीर, औरंगाबादचे तिन्हीही उमेदवार घोषित
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ‘एमआयएम’ने आपली चौथी आणि पाचवी यादी घोषित केली असून यामध्ये औरंगाबाद पूर्व, पश्चिम आणि मध्यच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी अखेरपर्यंत एम आय एम ला आघाडीसाठी दरवाजे उघडे राहतील असे घोषित केले असले तरी एम आय एम आता वंचित बहुजन आघाडीशी युती करण्यासाठी थांबणार नसल्याचेच यातून स्पष्ट होत आहे.
दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला अप्रत्यक्ष प्रतिसाद पाहून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज जलील यांनीही बाळासाहेब आंबेडकर जर याबाबत त्यांच्या पक्षाचे नेते खा. असदुद्दीन ओवैसी यांना थेट बोलले आणि त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला आणि आम्हाला आमच्या पक्ष प्रमुखांनी पुन्हा आघाडीचा आदेश दिला तर आमची तयारी असेल असे वक्तव्य केले होते मात्र त्यानंतरही दोन्ही पक्षात काहीही बोलणे न झाल्याने जाहीर केलेली काही नावे स्वतः खा. असदुद्दीन ओवैसी यांनी जाहीर केली आहेत तर काही नावे त्यांच्या आदेशाने आपण जाहीर करीत आहोत असे प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज जलील यांनी आपल्या प्रत्येक यादीत म्हटले आहे.
एम आय एम चे घोषित उमेदवार
१. औरंगाबाद पूर्व : डॉ. गफार कादरी, २. औरंगाबाद मध्य : नासेर सिद्दीकी ३. औरंगाबाद पश्चिम : अरुण बोर्डे ४. जालना: इक्बाल अहेमद पाशा, ५. रावेर – जळगाव : विवेक ठाकरे आणि ६. धुळे : मोहम्मद युसूफ हमीद मुल्ला यांना तिकीट देण्यात आल्याची माहिती एम आय एम चे प्रमुख खा. असदुद्दीन ओवैसी आणि प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज जलील यांनी दिली आहे.
ज्या मतदार संघातील नावे संवेदनशील आहेत त्यांची नावे स्वतः खा. असदुद्दीन ओवैसी यांनी घोषित केली आहेत. यामध्ये मुख्यत्वे करून मुंबई आणि औरंगाबादच्या उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. दरम्यानच्या काळात औरंगाबाद शहराच्या तिन्हीही मतदार संघातील नावे फायनल करणे इम्तियाज जलील यांना कठीण झाले होते त्यांनी औरंगाबाद शहरातील संभाव्य इच्छुक उमेदवारांची नावे पक्ष प्रमुख खा. असदुद्दीन ओवैसी यांच्याकडे पाठविल्यानंतर काही नाराज लोकांनी त्यांच्या विरोधात सह्यांची मोहीम चालविली होती. याची खबर खा. असदुद्दीन ओवैसी यांच्या कानावर जाताच त्यांनी व्हिडीओद्वारे माझ्या पक्षात असे चालणार नाही , तुम्हाला सूचना करण्याचा अधिकार जरूर आहे पण एकदा उमेदवार दिल्यानंतर तक्रार चालणार नाही किंवा सह्यांची मोहीम अजिबात चालणार नाही अशी तंबी एम आय एमच्या कार्यकर्त्यांना दिली होती. त्यामुळे मुंबई आणि औरंगाबाद शहरातील उमेदवारांची नवे स्वतः ओवैसी यांनी जाहीर केली आहेत.