महाराष्ट्र विधानसभा २०१९ : भाजप -सेनेचे सूत अखेर जुळले , बरोबरीचा सामना संपला, भाजप मोठा तर सेना झाली लहान भाऊ !!
महाराष्ट्र विधानसभेसाठी येत्या २१ ऑकटोबर मतदान होत असून उद्या २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होत असला तरी बहुचर्चित भाजप -सेना यांच्या युती होईल कि नाही याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. दरम्यान या दोन्हीही पक्षांच्या जागा वाटपाचा तिढा आता सुटला असून जागा वाटपात बरोबरीचे स्थान मागणाऱ्या शिवसेनेने शेवटी काळाचा महिमा ओळखून स्वतःला लहान भाऊ मानण्याचा मोठे पणा दाखविल्याने या चर्चेवर आता पडदा पडला आहे.
एका वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार शिवसेना-भाजपचं जागाचं गणित जुळलं असून पितृपक्ष आंपल्यानंतर २९ सप्टेंबरला अर्थात घटस्थापनेला घोषणा अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. मिळालेल्या माहिती नुसार भाजप १६२ जागा तर शिवसेना १२६ जागा लढवणार आहेत. त्यामुळे जागावाटपात भाजपच मोठा भाऊ ठरला आहे. उर्वरित जागा मित्रपक्षासाठी सोडण्यात येणार आहे. शिवसेना सोडून इतर मित्रपक्ष भाजपच्या ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात आहे मात्र याला त्यांची संमती असेल का ? हा प्रश्न गुलदस्त्यात आहे.
भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून जागावाटपाचा तिढा सुटण्यात जमा झाला आहे. शेवटच्या ११ जगांचा प्रश्न काही प्रमाणात सुटून तो आता फक्त ५ जागांच्या तडजोडीवर आला आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेत ५ जागांचाही तिढा सोडवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे कोणतीही परिस्थिती युती अभेद्य राहाणारच आहे, अशा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे. 1) औसा, लातूर जिल्हा, 2) वडाळा, मुंबई, 3) एरोली, ठाणे, 4) बेलापूर, ठाणे, 5) उल्हासनगर, ठाणे या पाच जागांच्या जागा वाटपाची लढाईसुद्धा आता जवळपास संपुष्टात आली असल्याचे वृत्त आहे.