सोशल मीडियाचा दुरुपयोग , तीन आठवड्यात उपाययोजना करण्याचे केंद्राला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
देशात सोशल मीडियाचा दुरूपयोग होत असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं असून सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी सोशल मीडियाच्या गैरवापरावर चिंता व्यक्त केली. हा दुरुपयोग थांबवण्यासाठी केंद्र सरकारने लवकरात लवकर नियम तयार करावेत असे आदेश दिले आहेत. यासाठी सरकारला तीन आठवड्याचा कालावधी देण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, सध्या असा नियमांची गरज आहे ज्यामुळे ऑनलाइन फसवणूक आणि सोशल मीडियावर दिशाभूल करणारी माहिती पोस्ट करणाऱ्यांना ट्रॅक करता येईल. सोशल मीडियाचा गैरवापर कऱणाऱ्यांना रोखण्यासाठी आपल्याकडं तंत्रज्ञान नाही असं म्हणता येणार नाही. जर गुन्हेगारांकडे फसवणूक करण्यासाठी तंत्रज्ञान आहे तर ते रोखण्यासाठीही तंत्रज्ञान असेलच.
न्यायाधीश दीपक गुप्ता आणि न्यायाधीश अनिरुद्ध बोस यांच्या पीठाने सोशल मीडियाच्या गैरवापरावर चिंता व्यक्त केली. सोशल मीडियावर चुकीचे मेसेज पसरवणाऱ्यांची खरी ओळख होत नाही. सरकारला आता यावर उपाययोजना केल्या पाहिजेत असंही त्यांनी म्हटलं. याआधीच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सोशल मीडियाबाबत लवकर पावले उचला असं सुनावलं होतं. जर तुम्ही काही करू शकत नसाल तर आम्हालाच काहीतरी करावं लागेल असं म्हटलं होतं.