‘ऑल इंडिया उलेमा बोर्डा’चा वंचित बहुजन आघाडीला जाहीर पाठिंबा, मॉब लिंचींगच्या विरोधात कायदा आणि मुस्लिमांना १० टक्के आरक्षणाची मागणी
येत्या दोन दिवसांत वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी घोषित केली जाईल अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली . विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षासाठी वंचित बहुजन आघाडीने इतर पक्षांशी आघाडी करण्यासाठी कोणतेही दरवाजे बंद केले नाहीत. आमचे दरवाजे खुले आहेत. मात्र आता काँग्रेससोबत आमचे जमणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. एमआयएमसोबत होणाऱ्या आघाडीवर स्पष्टपणे बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला. युती त्यांनी तोडली आहे आम्ही नाही इतकेच ते या विषयावर बोलतं म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना पुढे प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राज्यात काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी आम्ही सुरुवातीलाच काँग्रेसला १४४ जागांची ऑफर दिली होती. आता तीन आठवडे झाले तरी त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे आम्ही आता यावर फार बोलणार नाही.
राज्यात सीपीएमच्या एका गटाशी चर्चा सुरू आहे, तो आमच्या संपर्कात आहे. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाशी चर्चा सुरू आहे. दोन्ही बाजूने सकारात्मक चर्चा झाली आहे. तसेच राज्यात सेना-भाजपची युती असली तरी आणि नसली तरी आम्हाला फायदाच आहे. राज्यात २४० मतदार संघात आमचा सामना सेना-भाजपशी असल्याचे ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेत ‘ऑल इंडिया उलेमा बोर्डा’ने वंचित आघाडीला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. वंचितसोबत त्यांची बैठक झाली. त्यात मुस्लिमांना शिक्षणात १० टक्के आरक्षण द्यावे, मॉब लिंचींगसाठी कायदा झाला पाहिजे, अशा विविध मागण्या त्यांनी केल्या आहेत. राज्यात आम्ही २५ मुस्लिम उमेदवार जाहीर करणार आहोत, त्यात यांच्या उमेदवारांची नावे असतील, असे आंबेडकर यावेळी म्हणाले.
दरम्यान राज्य सरकारने दलित हा शब्द यापुढे शासकीय कामकाजात वापरला जाऊ नये, असा शासन निर्णय काढला आहे यावर त्यांची प्रतिक्रिया पत्रकारांनी विचारली असता ,त्यांनी शासनाच्या या निर्णयाचा विरोध केला. “भाजपने दलित शब्दाचे राजकारण न करता या वादातच पडू नये. दलित शब्द हा आमच्या उपयोगाचा आहे . भाजपला या निर्णयामुळे दलितांची मते मिनार नाहीत ”, अशी भूमिका त्यांनी माडंली आहे.