नाशिकच्या सभेत नरेंद्र मोदी यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्या आगामी मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब, सेनेची मोठी अडचण
‘देवेंद्र फडणवीसांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाची पाच वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. आता पुन्हा एकदा तेच मुख्यमंत्री होतील आणि सर्वाधिक काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद भूषवण्याचा विक्रमही ते मोडतील,’ असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या भाषणानंतर पंतप्रधान मोदी यांनीही देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आक्रमक राहील असे चित्र सफत होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये झालेल्या भाजपच्या ‘महाजनादेश यात्रे’च्या समारोप प्रसंगी भाजपच्या सर्वच नेत्यांनी पुन्हा सत्ता संपादन करण्याचा दावा केला आहे. शिवसेनेकडून याआधी मुख्यमंत्रिपदावर दावा करण्यात आलेला आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न शिवसेना नेत्यांनी केला आहे. त्यामुळे मात्र चंद्रकांत पाटील यांनी युतीची घोषणा होण्याआधीच मुख्यमंत्रिपदावर भाष्य केल्याने शिवसेना आता काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावं लागेल.
दरम्यान शिवसेना आणि भाजपच्या युतीचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. त्यातच युतीबाबत थेट वक्तव्य करून शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही रावतेंचं समर्थन केलं आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याला महत्व आले आहे.
‘जर युतीत शिवसेनेला समान जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटेल,’ असं म्हणून दिवाकर रावतेंनी खळबळ उडवून दिली होती. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आधी ५०-५० चा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. त्यामुळे दिवाकर रावते जे बोलले त्यात काहीही चुकीचं नाही.’
संपूर्ण राज्यभर सध्या विधानसभा निवडणुकांचं वारं वाहत आहे. त्यात भाजप शिवसेनेची युती तुटणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होणार का? याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे. जागावाटपावरून भाजप सेनेमध्ये वाद आहे. जागावाटपाचा फार्म्युला हा समसमान असणार की शिवसेनेला भाजप 115 ते 120 मतदारसंघच देणार, यावर सध्या मोठा सस्पेन्स आहे.