महाराष्ट्र विधानसभा २०१९ : पवारांची तुफान टोलेबाजी , तुझ्या हृदयात जर पवार साहेब मग गेला कशाला?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या दौऱ्यावर निघालेल्या पवारांचे कार्यकर्त्यांचे मेळावे चांगलेच गाजत आहेत ते या सभांमधील पवारांच्या तुफान फटकेबाजीमुळे . राष्ट्रवादी काँग्रेस मधून शिवेसना, भाजपा पक्षात प्रवेश करणाऱ्या नेत्यांच्या विरोधात पवारांनी अशीच टोलेबाजी करताना सवाल केला कि , तुझ्या हृदयात जर पवार साहेब मग गेला कशाला? हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील सभेत शरद पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आपल्याला मोठी लढाई करायची आहे, हा संदेशही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी बोलताना पवार म्हणाले कि, आज अनेक लोक आम्हाला सोडून विरोधी विचारांच्या पक्षात जात आहेत. मला अशा लोकांची काहीच चिंता नाही. ते जाताना सांगतात की पवार साहेब आमच्या हृदयात आहेत. तुझ्या हृदयात जर पवार साहेब मग गेला कशाला? हे लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे लोक आहेत. मात्र मी तसा नाही. ज्या खेड्यापाड्यातील लोकांनी आम्हाला मदत केली, शेवटच्या श्वासापर्यंत त्या माणसांसाठी झटणार, हा निर्धार कायम आहे.
सरकारवर टीकेचा भडीमार करताना ते म्हणाले , महाराष्ट्रात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कर्जबाजारी, दुष्काळ, शेतमालास भाव नाही अशा विविध गोष्टींमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. अशावेळी सरकारमधील लोकांनी शेतकऱ्यांचा कणा मजबूत करायला हवा. सरकार तशी भूमिका घेताना दिसत नाही.
“मी देशातील कृषी खात्याचा प्रमुख होतो. कांदा आम्ही बाहेरगावी पाठवला त्यामुळे कांद्याच्या किंमती वाढल्या होत्या. भाजपाचे लोक तेव्हा माझ्या अंगावर धावून आले. तेव्हा मी कुणाला न जुमानता जोपर्यंत पदावर आहे कांद्याला भाव देणार अशी भूमिका घेतली. ज्या भागात कापूस उत्पादन होते तिथे टेक्सटाईल पार्क्स उभी करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यावेळी वसमतमध्येही टेक्सटाईल पार्क उभे केले. मात्र आता फक्त तीस कारखाने सुरू आहेत. आम्ही सुरू केलेले कारखाने यांनी बंद केले. हे खाणाऱ्यांचा विचार करतात मात्र पिकवणाऱ्यांचा विचार करत नाहीत,” असंही यावेळी शरद पवार यांनी सांगितलं.
आणखी काय काय बोलले शरद पवार ?
लाखाचा पोशिंदा संकटात आहे. ६५ टक्के लोक शेती करतात पण कर्जबाजारी झाले आहेत. यंदा 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. रिजर्व्ह बँकेने 3 आठवड्यापूर्वी आर्थिक स्थिती चांगली नसल्याचं सांगितलं आहे. दिल्लीपासून सगळीकडे यांची सत्ता आहे, मात्र ते माझ्यावर टीका करतात, असा पलटवार शरद पवार यांनी केला आहे.
– पक्ष सोडताना नेते सांगतात विकास करण्यासाठी भाजपमध्ये जात आहे. पण या लोकांना मी अनेकवर्ष मंत्रिपदे दिली होती तेव्हा यांनी विकास केला नाही का ?
– तरुणांना नोकरी नसल्याने ते अविवाहित राहात आहेत
– मराठवाड्यात कारखानदारी मी आणली
– गिरणगाव उध्वस्त झालं. आता त्या ठिकाणी टोलेजंग इमारती उभ्या झाल्यात. तिथं मराठी माणूस नाही.
– या सरकारने किती कारखाने आणले यापेक्षा किती कारखाने बंद पाडले, याची आकडेवारी शासनाने द्यावी.
– नाशिकमध्ये पोलिसांनी हुकूम काढला की विरोधी पक्षांनी घराबाहेर पडले तर अटक करू. हा काय प्रकार आहे?
– मोदी नाशिक सोडेपर्यंत कांदा हातात असता कामा नये. बिचारे कांद्याला एवढे घाबरतात अन् पाकिस्तानला धमकवण्याची भाषा करतात.
– किल्ले हे शौर्याचा इतिहास आहेत. पण सरका ने जाहीर केले पर्यटनासाठी दारू आणि अन्य सुविधा असणार.
– ज्या किल्ल्यात तलवारची आवाज यायचा तिथं आता छमछमचा आवाज येणार.
– निवडणूक लढवणं आता माझ्या सारख्याचं काम राहिलं नाही. नवीन नेतृत्व उभं झालं पाहिजे.