केंद्र आणि राज्य सरकारवर आर्थिक मंदीबाबत प्रकाश आंबेडकर यांचा आरोप
देशात ४० ते ४५ टक्के जनता ही गरीब असताना वंचित घटक हा अधिक वंचित राहावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून मंदी लादत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. प्रकाश आंबेडकर हे राज्यभर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित सत्ता संपादन महारॅलीत बोलत होते. मंदी ही अशांततेची सुरुवात असून ही अशांतता देशातील भाजप सरकार आणत असल्याचा आरोपही वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लातूरमध्ये केला आहे.
यावेळी बोलताना आंबेडकर पुढे म्हणाले कि , आताची मंदी ही नोट बंदी सारखी असून त्यावेळेही नोटाबंदीची गरज नसताना सरकारने ती लादली. आता सरकार देशातील विरोधी पक्ष संपवून हुकूमशाही सारखे वागत आहेत .
लातूरच्या टाऊन हॉल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क मैदानावर आयोजित भव्य सभेत आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप सरकार उलथवून लावण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.