एमआयएमलाही दिल्या प्रकाश आंबेडकरांनी शुभेच्छा , युती तुटल्यावर त्यांनी काय दिली प्रतिक्रिया … ?!!
एमआयएमने वंचित बहुजन आघाडीची युती तोडल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया देताना त्यांनीही एमआयएमला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान विधानसभेच्या २५ जागांवर मुस्लिम समाजातील उमेदवार देणार अशी घोषणाही त्यांनी केली. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे मातंग समाजाच्या वतीने सत्तासंपादन व प्रबोधन मेळाव्यासाठी ते आले होते त्यावेळी ते बोलत होते. एमआयएम सोबत युती तुटली तरी त्याचा वंचित आघाडीवर परिणाम होणार नाही असेही आंबेडकर म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत सोशल इंजिनिअरिंगचा नारा देत महाराष्ट्राच्या राजकारणात नवा प्रयोग करीत असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली हेती. त्याचाच एक भाग म्हणून एमआयएम सोबत युती करून वंचित -बहुजन- मुस्लिम ऐक्याची हाक त्यांनी दिली होती. लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’बहुजन आघाडीचा फटकाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसल्याचे दिसले होते. मात्र आता लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या चारच महिन्यात प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम यांची युती तुटली आहे . लोकसभा निवडणुकीत आम्हाला मुस्लिम मतं मिळालीच नाहीत असे मत व्यक्त करीत एमआयएम सोडून गेल्याने आघडीचे फारसे नुकसान होणार नाही असेही ते म्हणाले.
गेल्या निवडणुकीत मुस्लिम समाजाने वंचित आघाडीला मतदान केले नव्हते असे सांगत एमआयएम सोबत युती तुटल्याची त्यांनी थेट कबुली दिली. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असून तो एमआयएमलासुद्धा आहे असे सांगत एमआयएम ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत असंही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीनंतर मुस्लिम समाजाचा आत्मविश्वास वाढल्याने तो समाज आमच्या सोबत आहे असंही त्यांनी सांगितलं.