उर्मिला मातोंडकर काँग्रेसमध्ये आली तशी बाहेर गेली …पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून दिला राजीनामा
उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा दिला असल्याचं स्पष्टीकरण उर्मिला यांनी दिलं आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी लोकसभा निवडणुकांदरम्यान काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांना पक्षाने उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. पण त्यांचा निवडणुकीत पराभव झाला होता.
उर्मिला यांनी असं म्हटलं आहे की, ‘जेव्हा मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलींद देवरा यांना मी १६ मे रोजी पाठवलेल्या पत्रावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, तेव्हा पहिल्यांदा माझ्या मनात राजीनाम्याचा विचार आला. या पत्रातील गोपनीय माहिती नंतर सोयीस्करपणे माध्यमांना पुरवण्यात आली. मी याचा वारंवार निषेध करूनही पक्षातील कोणीही माफी मागण्याचीही तसदी घेतली नाही. या पत्रात ज्यांची नावे होती त्या उत्तर मुंबईतील काही जणांना त्यांच्या निवडणुकीतल्या वाईट कामगिरीबाबत जाब विचारण्याऐवजी नवी चांगली पदे देण्यात आली.’
मुंबई काँग्रेसमध्ये महत्त्वाची पदे सांभाळणाऱ्यांनी पक्षाच्या भल्यासाठी काहीही बदल करण्याचा प्रयत्न केलेला नाही. माझी राजकीय आणि सामाजिक जाण मला पक्षांतर्गत राजकारणासाठी माझा वापर करू देण्यापासून परावृत्त करते. मला मुंबई काँग्रेसमध्ये व्यापक उद्दिष्टासाठी काम करायचं होतं, असं उर्मिला यांनी म्हटलं आहे.
पक्षातून बाहेर पडले तरी लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या पाठीशी उभं राहणाऱ्या लोकांचे आणि माध्यमांचेही त्यांनी आभार मानले आहेत.