धक्कादायक खुलासा : ‘वंचित ‘ ने अविश्वास व्यक्त करताच चौथ्या दिवशी काय बोलले खा . इम्तियाज जलील ?
वंचित बहुजन आघाडीशी एमआयएमने फारकत घेतल्यानंतर, एम आय एम चे प्रदेशाध्यक्ष यांच्या निवेदनावर वंचित नेत्यांनी अविश्वास दाखविल्याचा वृत्तानंतर खा. इम्तियाज जलील यांनी चार दिवसानंतर पहिल्यांदा पत्रकार परिषदेत आपली भूमिका जाहीर करीत वंचित बहुजन आघाडीकडून एमआयएम प्रदेशाध्यक्ष किंवा एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत कोणत्याही प्रकारची जागा वाटपाची चर्चा सुरू नाही. तसे असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी हे जाहिर करावे. असे सांगितले.
वंचितच नेते आपल्यावर आपल्यावर अविश्वास दाखविण्याचा घाणेरडेपणा करीत आहेत. वास्तविक त्यांचे कोणाशीही बोलणे चालू नाही. एक तासापूर्वी मी ओवैसी साहेबांना बोललो त्यांना कुणाचाही फोन आला नाही . पुढे बोलताना खा. जलील म्हणाले कि , वंचित बहुजन आघाडीशी आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी एमआयएमची युती व्हावी हि माझी इच्छा होती. ओवेसीसाहेबांना या युतीविषयी मी आग्रह धरला होता आणि मलाच “व्हिलन” ठरविण्याचा प्रयत्न होत आहे. हे निंदनीय आहे.
मी शुक्रवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनावर इंग्रजी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना पक्ष प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी स्पष्टपणे सांगितले कि , इम्तियाज जलील आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांनी घेतलेली भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका आहे. त्यामुळे आमचे मतभेद आहेत , हा निर्णय माझा एकट्याचा आहे हे म्हणणे निंदनीय आहे. मला शंका आहे कि , आर एस एस च्या लोकांमुळे त्यांनी एमआयएमशी युती न करण्यासाठी ८ जागा आम्हाला दिल्या आहेत का ? असा प्रश्नही इम्तियाज यांनी उपस्थित केला.
आजच्या पत्रकार परिषदेत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीच्या युती बाबत इम्तियाज जलील यांनी पक्षाची बाजू सादर केली. यावेळी जलील यांनी सांगितले कि, लोकसभा निवडणूकीनंतर दिल्लीत खासदार ओवेसी आणि अड. प्रकाश आंबेडकर यांच्यात आघाडीबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर ९४ जागेची यादी केली होती. यात सुधारणाकरून ७४ जागेची यादी वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना ईमेलवर देण्यात आली होती. १७ जागांचा कुठलाही संबंध नाही . या यादीवर आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या संसदीय समितीसोबत बैठक घेतली. या बैठकीत जागेवर चर्चा होण्यापेक्षा लोकसभेच्या निवडणूकीच्या विषयावर चर्चा करण्यात आली. यानंतरही आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्याकडून निर्णयाची वाट पाहात होतो. यानंतरही ओवेसी आणि आंबेडकर यांची पुण्यात तीन तास बैठक झाली.
या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी फक्त ८ जागा देण्याचा संदेश ओवेसी यांना पाठविला. आम्ही ७४ जागेचा प्रस्ताव दिला होता. या जागेबाबत आम्ही तडजोड करण्यासाठी तयार होतो. मात्र आम्हाला किती जागा देणार याबाबत निर्णयच होत नसल्याने अखेर एमआयएमला मुलाखती घेण्याचा निर्णय घ्यावा लागला. आगामी काळात एमआयएमशी चर्चा करून चाळीस जागा दिल्यास विचार होऊ शकतो. यासाठी प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांच्यात चर्चा होणे अपेक्षीत आहे. एमआयएमचे पक्ष प्रमुख ओवेसी यांनी आघाडीचा निर्णय घेतील. असेही जलील यांनी स्पष्ट केले.
सोशल मिडीयावर ओवेसी यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्यांनी एमआयएमच्या कोणत्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा चालु आहे. ते जाहिर करावं. कारण ओवेसी यांच्याशी चर्चा सुरू नाही. प्रदेशाध्यक्ष म्हणून मी काम करित आहे. माझ्यासोबतही चर्चा सुरू नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या राज्यातील विधान सभेची यंदा होणारी निवडणूक ही वंचित आघाडी व एमआयएमसाठी अनुकूल होती. मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या भवती काही आरएसएस विचाराचे लोक जमा झालेले आहेत. काही चुकीचे लोक वंचित आघाडीत घुसल्याने त्यांच्याकडून ही युती तोडण्यात आली असल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी केला. या पत्रकार परिषदेत एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख अहेमद, एमआयएमचे शहराध्यक्ष समीर अब्दुल साजेद, महापालिकेचे गटनेते गंगाधर ढगे यांची उपस्थिती होती.