Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

रिपाइं मेळाव्यात आठवलेंनी मागितल्या १० जागा तर मुख्यमंत्री म्हणाले आगामी विधानसभेत रिपब्लिकन पक्षाचे ४-५ आमदार निवडून येतील

Spread the love

महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार पुन्हा विराजमान होणार ही काळ्या दगडावरची रेघ असून, आगामी विधानसभेत रिपब्लिकन पक्षाचे चार ते पाच आमदार निवडून आलेले असतील. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी भाजपचीच असेल असे निसंदिग्ध आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी वरळी येथे आयोजित आठवले गटाच्या मेळाव्यात दिले.

आम्ही भारतीय संविधान आणि आरक्षणाच्या विरोधात असल्याचा खोटा प्रचार काँग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधक करीत आहेत. पण त्यांच्या म्हणण्यात काडीचेही तथ्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संविधानाची शपथ घेऊन कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजप शिक्षण व नोकऱ्यातील आरक्षण घालवणार, देशाची राज्यघटना बदलविणार ही टेप विरोधकांनी आता बंद करायला हवी असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी लगावला.

आगामी विधानसभा निवडणुकीत रिपाइंचे किमान चार ते पाच आमदार विधिमंडळात नक्की निवडून येतील, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्याची सर्वस्वी जबाबदारी भाजपची असेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी आवर्जून स्पष्ट केले. चैत्यभूमीवरील इंदू मिलच्या जागेवरील जागतिक दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक नजीकच्या काळात होईल ते जगभरातील लोकांचे आकर्षण राहील. नागपूरच्या दीक्षाभूमीच्या आणखी विकासासाठी मोठा निधी देण्यात आला असून, सरकार राबवित असलेल्या अनेक योजना मुख्यमंत्र्यांनी यावेळी आवर्जून सांगितल्या.

यावेळी बोलताना रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले विधानसभेच्या दहा जागांची मागणी करून भाजप-शिवसेना व मित्रपक्षांची महायुती होईल तसेच या महायुतीच्या एकूण २३५ जागा निवडून येतील, असा अंदाज  व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे, राज्यमंत्री अविनाश महातेकर, शिवसेनेचे खा. राहुल शेवाळे व रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे उपस्थित होते.

दरम्यान, आजच्या मेळाव्याला रिपाइंने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रीत केले होते. मात्र ते या कार्यक्रमास हजर नव्हते. युतीमधील जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या मेळाव्यास येण्याचे टाळले अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!