Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज, जायकवाडीच्या लाभक्षेत्रातील रहिवाश्यांनी भीती बाळगू नये.

Spread the love

नाशिक तसेच अहमदनगर जिल्ह्यात गोदावरी पाणालोट क्षेत्रामध्ये गेल्या 3 दिवसांपासून सततची अतिवृष्टी आणि मोठा पाऊस झाल्याने, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातुन काल दिनांक 4 ऑगस्ट पासूनच फार मोठ्या प्रमाणात धरण भरल्याने, विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. हा विसर्ग प्रामुख्याने दारणा धरण समुह, गंगापुर धरण समुह आणि पालखेड धरण समुह, या 3 धरण समुहामधून गोदावरी नदी पात्रात करण्यात येत आहे. 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता तिन्ही धरण समुहातुन एकत्रित विसर्ग नांदूर-माधमेश्वरमधून एक लाख क्युसेकने सोडण्यात येत होता.  हा विसर्ग टप्याटप्याने वाढत जाऊन, संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास 2 लाख 62 हजार क्युसेक तर रात्री 9 वाजेच्या सुमारास 2 लाख 92 हजार क्युसेक इतक्या क्षमतेने सोडण्यात आला. हा विसर्ग हा सन 2006 नंतरचा जायकवाडी नदी पात्रात सोडण्यात आलेला सर्वात मोठा विसर्ग आहे.

याबाबत पाटबंधारे विभागाकडून पूर्वकल्पना मिळताच  जिल्हाधिकारी उदय चौधरी, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, स्थानिक महसुल प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा परीषद प्रशासन तसेच शासकीय यंत्रणा व राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), धुळे यांच्या विशेष पथकाच्या सहकार्याने दिनांक 04 ऑगस्ट रोजी रात्री उशिरापर्यंत वैजापुर तालुक्यातील नागमठाण, चेंडूफळ, डोणगाव, बाभूळगाव गंगा, बाबतारा, वांजरगाव, शिंदेवस्ती आणि पुरणगाव तसेच गंगापूर तालुक्यातील नेवरगाव, हैबतपुर, बागडी, जामगाव, ममदापुर, आगर कानडगाव, अंमळनेर, लखमापुर व कायगाव  या 17 गावांमधील 463 पेक्षा अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

यापैकी सर्वाधिक पुराचा फटका बसलेला भाग गंगापूर तालुक्यातील वांजरगाव मधील शिंदे वस्ती हा असुन, सदर वस्ती दिनांक 04 ऑगस्ट रोजी रात्रीतुन लाडगाव येथील शाळेत सुखरुपरित्या हलविण्यात आलेली आहे.  विस्थापित बंधू-भगिनिंना प्रशासनामार्फत तसेच सामाजिक संस्थांमार्फत मदतकार्याच्या स्वरुपात नाष्टा, जेवणाची व पिण्याच्या पाण्याची तसेच आरोग्य सेवेसाठी आरोग्य पथकाची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच महत्तम विसर्गाने प्रभावित होणाऱ्या नदीपात्रातील पाणी वाढण्याची शक्यता लक्षात घेता, परीस्थिती अधिक गंभीर होऊ नये यादृष्टीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) 5वी तुकडी, पुणे यांचे विशेष पथकास पाचारण करण्यात आले आहे.

नांदूर-माधमेश्वर वरुन झालेला विसर्ग प्रत्यक्षात पैठण येथील जायकवाडी प्रकल्पात संचयित होण्यासाठी साधारणत: 24 ते 30 तासांचा अवधी अपेक्षीत आहे. त्यानुसार प्रत्यक्षात दिनांक 04 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजेनंतर सोडण्यात आलेला मोठ्या प्रमाणातील विसर्ग हा दिनांक 05 ऑगस्ट रोजी संध्याकाळी जायकवाडी धरण क्षेत्रात संकलीत होण्यास सुरुवात होणार आहे.

तथापि यापुर्वी देखील सतत गेल्या 3 दिवसांपासून सोडलेल्या विसर्गाचा परीणाम म्हणून जायकवाडीची पाणी पातळी ही दिनांक 30 जुलै रोजी -4.63% वरुन वाढून आज  05 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता 24.63% इतकी वाढलेली आहे. सद्यस्थितीत जायकवाडी धरणाची पाणी पातळी 1504.09 फुट (458.45 मीटर) एवढी असुन, 96536 क्युसेक क्षमतेने आवक चालू आहे त्याचप्रमाणे जायकवाडी धरणात एकुण 1272.868 दलघमी एवढा जलसाठा असुन त्यापैकी जिवंत पाणी साठी 534.762 दलघमी आहे तर धरणाची एकुण टक्केवारी 24.63% वर पोहचली आहे. तसेच संभाव्य होत असलेल्या मोठ्या विसर्गाचा विचार करता, सदर पाणी पातळी ही दिनांक 06 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत 35% चे पुढे जाण्याची शक्यता आहे. असे असले तरी जायकवाडीतुन गोदावरी पात्रात कोणताही विसर्ग सोडण्याबाबतचे नियोजन नसल्यामुळे जायकवाडीच्या लाभक्षेत्रातील तसेच पैठण येथील रहिवासी नागरिकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!