येत्या १५ दिवसांच्या काळात भाजप-सेनेच्या जागावाटपाबाबतचा निर्णय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५२ नगरसेवकांसह काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार भाजपच्या आश्रयाला
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवेसनेची युती अभेद्य राहणार असून, या वेळी बहुमताचे विक्रम तोडून युती सत्तेत येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. येत्या १५ दिवसांच्या काळात जागावाटपाबाबतचा निर्णय घेणार असल्याचेही ते म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदारांच्या मुंबईतील प्रवेश सोहळ्यात ते बोलत होते.
भाजप आणि शिवसेनेच्या युतीबाबत संशय निर्माण करणाऱ्या चर्चा चुकीच्या असून ही युती अभेद्य आहे. भाजप आणि शिवसेनेत काही जागांबाबत मतभेद नक्कीच आहेत. मात्र, त्याबाबत येत्या १५ दिवसांच्या काळात चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. काही भाजपच्या जागा शिवसेनेला द्याव्या लागणार आहेत, तर काही शिवसेनेच्या जागा भाजपकडे येऊ शकतात, अशी जागांची अदलाबदल करण्याचा निर्णयही १५ दिवसांत घेऊन जागावाटप निश्चित करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही युतीचेच सरकार राज्यात आणणार आहोत, नव्हे राज्यातील जनताच आमचे सरकार आणणार आहे. उद्या पासून राज्यात महाजनादेश यात्रा सुरू होत असून या यात्रेदरम्यान जनादेश युतीच्या पाठिशी आणण्याचे काम आपण करणार असल्याचे मुख्यमंत्री पक्ष प्रवेश सोहळ्यात म्हणाले.
मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, वैभव पिचड, शिवेंद्रसिंहराजे भोसले, चित्रा वाघ, कालिदास कोळंबकर, संदीप नाईक, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक, माजी आयपीएस अधिकारी साहेबराव पाटील आणि महात्मा फुले यांच्या वंशज नीता होले यांचे पक्षात स्वागत केले. भारतीय जनता पक्ष ही धर्मशाळा नसून कुणालाही भाजपत प्रवेश दिला जात नसल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले. भाजप कुणालाही धमक्या देऊन प्रवेश देत नाही. भाजपला धमक्या देऊन कुणाला पक्षात घेण्याची काही आवश्यकता नाही. एक काळ असता होती की भाजप कार्यकर्ते इतरांच्या मागे फिरायचे. मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आज अनेकजण पक्षात येण्यास उत्सुक आहेत. मात्र जे चांगले काम करतात अशांनाच प्रवेश देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये आज प्रवेश केला. निवडणुकीच्या तोंडावर इतरही नेते भाजपात येतील असं यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर पिचड, वैभव पिचड, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे, संदीप नाईक या सगळ्यांचा भाजपा प्रवेश झाला. तसेच कालिदास कोळंबकर यांचाही भाजपात प्रवेश झाला. त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपात प्रवेश केला. नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५२ नगरसेवकांनीही भाजपात प्रवेश केला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती.