मुंबई , कोकणात पाऊस चालूच , मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही दमदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज
मुंबई आणि कोकण भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस उसंत घेण्याची काही शक्यता नाही. पुढचे चार ते पाच दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पुढचे पाच दिवस रायगड आणि कोकणात अती मुसळधार पाऊस पडणार आहे. तर मुंबई आणि ठाणे परिसरातही मुसळधार पाऊस बरसणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाचा जोर वाढला आहे. या सोबतच मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही दमदार पाऊस होईल असं हवामान खात्याने म्हटलं आहे.
गेल्या १० दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. उकाडाही प्रचंड प्रमाणात वाढला होता. मात्र गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पुन्हा परतला आहे. मुंबईजवळच्या कर्जत आणि वांगणी परिसरात दोन दिवसांपासून प्रचंड पाऊस झाल्याने उल्हास नदी ओव्हर फ्लो झाली होती. त्यामुळे हा परिसर पूर्ण पाण्याने वेढला होता. त्यात महालक्ष्मी एक्सप्रेस अडकल्याने NDRF आणि नौदलालाही पाचारण करण्यात आलं होतं. एक्सप्रेसमधल्या 1 हजारांपेक्षा जास्त लोकांना बचाव पथकाने बाहेर काढलं होतं.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात असणारे नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात देखील पाणी शिरलं आहे. आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास जागृत देवस्थान असणाऱ्या दत्त मंदिरात दुसऱ्यांदा दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला आहे. हे दत्त दत्तमंदिर कृष्णेच्या काठी वसलेले आहे. हा दक्षिणद्वार सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ९ जुलै रोजी यावर्षी पहिल्यांदा दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला होता. त्यानंतर आता हा दुसऱ्यांदा दक्षिणद्वार सोहळा झाला.
पुरंदर जवळचं वीर धरण ९३ टक्के भरलं असून धरणातून ४३५० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आलं आहे. त्याच बरोबर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणाचा पाणीसाठा वाढला आहे. भाटघर धरण 62 टक्के, नीरा देवघर व गुंजवणी धरणे ६३ टक्के भरली आहेत. धरण परिसरात पावसाला जोर असल्याने या तिन्ही धरणातून पाणी सोडण्यात आलेलं आहे. वीर धरणातून नीरा नदीत २१५० क्यूसेक तर उजव्या कालव्यातून १५५० क्युसेक्स, डाव्या कालव्यातून ६५० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.