कर्जबाजारीपणामुळे चिन्ताग्रस्त झालेल्या तरुण शेतकरी पती-पत्नीने केली आत्महत्या
दुष्काळामुळे गेल्या तीन वर्षांमध्ये उत्पन्न नाही. त्यामुळे डोक्यावरचे कर्ज फेडणार कसे? या विवंचनेत लोटन रामराव पवार आणि सुनिता लोटन पवार या दाम्पत्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. अमळनेर तालुक्यात पिळोदे येथे बुधवारी दुपारी दोन वाजता आपल्या राहत्या घरी पवार दाम्पत्याने गळपास घेऊन आत्महत्या केली आहे. तरुण शेतकरी दाम्पत्याने कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
लोटन पवार त्यांच्यावर राष्ट्रीयकृत बँक, पीक विकास सोसायटी आणि खासगी सावकारांचे कर्ज होते. ते कर्जाचे हप्ते देऊ शकत नव्हते, परतफेड न झाल्याने कर्जचा तगादा त्यांच्यामागे केला जात होता, अशी माहिती समोर आली आहे. या सगळ्या विवंचनेत असलेल्या या दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. अतिशय सुस्वभावी असे, हे दाम्पत्य होते. मात्र, मागील काही दिवसांपासून ते आर्थिक विवंचनेत होते. या दाम्पत्याला दोन मुले आहे. मोठा मुलगा हा आठवीत तर लहान मुलगा चौथीत शिक्षण घेत आहे. घरात वयोवृद्ध आई आणि विधवा दोन बहिणींची जबाबदारी सुद्धा लोटन पवार यांच्यावर होती. संपूर्ण परिवाराचा भार असताना डोक्यावरच कर्ज फेडणे अवघड झाल्यामुळे त्यांनी कठोर पाऊल उचलले. गेल्या तीन वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील शेतकरी हा दुष्काळाचा सामना करत आहे. यंदाही दुष्काळी परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला आहे. भीषण पाणीटंचाई होती. अमळनेर तालुका हा टंचाईग्रस्त तालुका मानला जातो.