भरधाव बसच्या धडकेने मजुरांचा जागीच अंत , दोन गंभीर जखमी
भरधाव बसने दुचाकीला जोराची धडक दिल्याने एका मजुराचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळी जालना महामार्गावरील वाई पाटीजवळ घडली. मंठा तालुक्यातील वाई येथील कैलास रंगनाथ उबाळे (वय-३४), विष्णू कुंडलिक उबाळे (वय-२८), हरी नारायण उबाळे (वय-१९) हे तिघे शनिवारी सकाळी दुचाकीवरून (क्र. एम.एच.२०- ९६८०) अंबा येथे विहिरीवर काम करण्यासाठी जात होते. वाई पाटीवरून रस्ता ओलांडणाºया दुचाकीला भरधाव बसने (क्र.एम.एच.२०- बी.एल.१७७७) जोराची धडक दिली.
या अपघातात बसच्या चाकाखाली अडकल्याने ७० फूट फरफटत गेलेल्या कैलास उबाळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर विष्णू उबाळे, हरी उबाळे हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जालना येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर परतूर पोलीस ठाण्याचे संदीप जाधव, दीपक ढवळे, खाडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.