पुन्हा बाहुत बळ आणण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या मुंबईत दोन दिवसांपासून बैठका
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली असून एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व सूत्रं आपल्या हाती घेत झाडाझडतीला सुरुवात केली आहे तर दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांनीही बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. मात्र या बैठकींना आमदारांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे. बैठकांना आमदारच येत नसल्याने काँग्रेसच्या बड्या नेत्यांची चिंता वाढली आहे. या आमदारांना एकत्र कसं ठेवायचं असा पेच या नेत्यांना पडला असल्याचे समजते . लोकसभेतल्या पराभवाने खचलेल्या काँग्रेसच्या नेत्यांचा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळला असून प्रदेशाध्यक्ष आणि पक्षप्रभारी या दोनही नेत्यांचा पराभव झाल्याने सर्वच पक्षात अस्वस्थता आहे. त्यामुळे कोणी कोणाला जाब विचारायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे . मात्र यातून सावरण्याचा प्रयत्न करण्यासाठी वरिष्ठ नेते बैठका घेतायत तर त्यांच्याकडे आमदारच पाठ फिरवत असल्याचे चित्र आज दिसले .
महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यासह काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या बैठकी गेल्या दोन दिवसांपासून सुरु आहेत. मात्र या बैठकांना वैयक्तिक कारणं देत काही आमदार या बैठकांना गैरहजर राहिले आहेत. या नेत्यांमध्ये विश्वजित कदम, सतेज पाटील, भारत भालके, संजय निरूपम सारख्या नेत्यांचा समावेश आहे.
पाठ फिरवणाऱ्या नेत्यांमधले काही नेते काँग्रेस पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत अशीही चर्चा आहे. मुंबई विभागाच्या बैठकीसाठी मिलींद देवरा, प्रिया दत्त, उर्मिला मांतोडकर बैठकीस होते उपस्थित पण निरूपम यांनी मुंबईत असून खरगेंच्या बैठकीकडे पाठ फिरवली.