राज्यातील दुष्काळावर शरद पवारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळावर उपाययोजना करण्याबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृहावर पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी शरद पवरांसोबत विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, इंदापुरचे आमदार दत्ता बारणे उपस्थित होते. राज्यातील भीषण दुष्काळ आणि बारामती वैद्यकीय महाविद्यालयाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बारामती तालुका हा दुष्काळी असून गेले दोन दिवस शरद पवार यांनी या दुष्काळी भागाचा दौरा करत शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. बारामतीसह राज्यात भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळाचा सामना राज्यातील जनता करत आहे. या सगळ्या शेतकर्यांच्या समस्या शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. या बैठकीनंतर अजितदादा पवार यांनी सांगितले की, बारामतीमध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाबाबत १०० जागांची पहिली बॅच ऑगस्टमध्ये सुरु होणार आहे. याबाबत बैठक पार पडली आहे. दुष्काळाचे काही मुद्दे मुख्यमंत्र्यांसमोर उपस्थित केले. जनावरांच्या छावण्या बंद करू नका… हिरवा चारा येत नाही तोपर्यंत टँकर पाणीपुरवठा कमी होत आहे. त्याबाबत सरकारने नियोजन करावे अशी मागणी करण्यात आली असल्याचे अजित पवारांनी सांगितले.
दरम्यान, बारामतीच्या पाणी प्रश्नावर अजित पवार यांनी सांगितले की, बारामती पाण्यासंदर्भात आमची भूमिका ही आहे की, दुष्काळात असे वाद पुढे आणू नये, पाण्याची पळवापळवी झालेली नाही, कुणीही कुणाचे पाणी पळवले नाही, सध्या कुठल्याच धरणात पाणी नाही, ऑक्टोबरमध्ये नविन सरकार येईल त्यावेळीचा हा प्रश्न आहे, कालवा सल्लागार समिती बसते त्यातून हे निर्णय होतात. जे वाटप झालंय तसे पाणी मिळणार अशी स्पष्ट भूमिका मांडली असल्याचे अजितदादा पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे १० आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. त्यावर बोलतना अजित पवार यांनी सांगितले की, प्रकाश आंबेडकर यांनी एकाचं तरी नाव सांगावं. त्याच्यासोबत कशाला आमचे आमदार जातील. याला काडीचा आधार नाही. हा दावा धादांत खोटा आहे अशी स्पष्ट भूमिका अजितदादा पवार यांनी घेतली आहे.