विराट असला म्हणून काय झाले , झाला ५०० रुपये दंड !!
पिण्याचे पाणी गाडी धुण्यासाठी वापरल्यामुळे भारतीय कर्णधार विराट कोहलीला ५०० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गुरूग्राम महापालिकेकडून बुधवारी ही कारवाई करण्यात आली आहे. विराट कोहली सध्या इंग्लंडमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. पण विराट कोहलीच्या गुडगावमधील घरी पाण्याचा अपव्यय केल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
प्रसारमाध्यमांच्या वृत्तनुसार, डीएलएफ फेस-1 येथील विराट कोहलीच्या घरी पाइपनं गाड्या धुतल्या जात होत्या. पाण्याचा गैरवापर आणि गाडी धुतल्याकारणामुळे घरातील कामगार दीपक याच्यावर कारवाई करण्यात आली. दीपककडून ५०० रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विराट कोहलीच्या घरांमध्ये अर्धा डझन गाड्या असतात. त्यामध्ये दोन एसयूवी गाड्यांचाही समावेश आहे. या गाड्यांना दररोज धुतले जाते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. कित्येकवेळा आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला पण दीपक आणि चालकांवर काही फरक पडला नाही. तक्रारीनंतर गुरूग्राम महानगर पालिकेचे आधिकारी अमन फोगाट यांनी पाण्याचा गैरवाप केल्यामुळे दंड ठोठावला.