अखेर राधाकृष्ण विखे-पाटील आणि अब्दुल सत्तार यांची काँग्रेसला फारकत , विखे पाटलांचा आमदारकीचा राजीनामा
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि माजी मंत्री व औरंगाबाद काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावरून पदच्यूत केलेले आमदार अब्दुल सत्तार या दोघांनीही काँग्रेस पक्षाला अधिकृत सोडचिट्ठी दिली आहे . पक्षाविरोधात बंड करून लोकसभा निवडणुकीत मुलाला भाजपच्या तिकिटावर निवडून आणणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला. विधानभवनात विधानसभा अध्यक्षांची भेट देऊन त्यांनी आपला राजीनामा त्यांच्याकडं सोपवला. तर अब्दुल सत्तार यांचे म्हणणे असे आहे कि , मला पक्षाने काढून टाकले आहे त्यामुळे मी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही . अर्थात पक्षाने त्यांना काढून टाकल्यामुळे ते आमदार आहेत कि नाहीत हे मात्र समजू शकले नाही .
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून मुलाला काँग्रेसची उमेदवारी मिळवून देण्याचे प्रयत्न फोल ठरल्यानंतर विखे-पाटील मनाने काँग्रेसपासून दूर गेले होते. पक्षात राहून त्यांनी उघडपणे भाजपकडून निवडणूक लढविणाऱ्या आपल्या मुलाचा व शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. त्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेते पदाचाही राजीनामा दिला होता. देशात पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएची सत्ता आल्यानंतर तसंच, मुलगा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झाले होते.
अलीकडेच नगरमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भाजप नेते गिरीश महाजन यांची भेट घेऊन त्यांनी चर्चाही केली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमधील आमदार, नेते व पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीही सुरू केल्या होत्या. आज आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी पुढचं पाऊल टाकलं. आता त्यांच्या भाजप प्रवेशाची केवळ औपचारिकता उरली आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मंत्रिमंडळात समावेश करून त्यांना पुण्याचे पालकमंत्रिपद दिले जाणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान औरंगाबाद लोकसभेत काँग्रेस विरोधात बंडाचा झेंडा उभे करणारे आमदार अब्दुल सत्तार यांनीही आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे . त्यांना पक्षातून काढून टाकल्यावर त्यांनी उघडपणे आपल्या मतदार संघात भाजपचे जालना लोकसभा मतदार संघातील उमेदवार रावसाहेब दानवे यांना मदत केली होती . काँग्रेसचे हे दोन्हीही आमदार भाजपच्या दारात आहेत .