Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

३०० हून अधिक जागा मिळाल्यामुळे मोदींना मनमानी करता येणार नाही : खा. असदुद्दिन ओवेसी

Spread the love

या देशात आम्ही भाडेकरू नाही तर समसमान भागीदार आहोत

‘मोदींना जर असं वाटत असेल की ३०० हून अधिक जागा मिळाल्यामुळे ते देशावर मनमानी करू शकतील तर तसं होणार नाही. भाजपला घाबरण्याची मुसलमानांना काहीच गरज नाही. मुस्लिम बांधवांनी भाजपला घाबरू नये. या देशात आम्ही भाडेकरू नाही तर समसमान भागीदार आहोत. हिंदूंइतकाच आमचाही या देशावर अधिकार आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आम्हाला संविधानाने दिला आहे अशा शब्दात केंद्रातील भाजप सरकारवर एमआयएम प्रमुख खासदार असदुद्दिन ओवेसींनी निशाणा साधला आहे. हैदराबाद येथे मक्का मशिदीत एका जनसभेला ते संबोधित करत होते.

सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ३०० हून अधिक जागा घेत भाजप विजयी झाल्यानंतर दोनच दिवसांत दिल्लीजवळील गुरुग्राम येथे एका मुस्लिम बांधवावर हल्ला करण्यात आला. अशा घटना देशातील इतर भागांमध्ये गेल्या पाच वर्षांत अनेकदा घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारवर असदुद्दिन ओवेसी यांनी सडकून टीका केली.

आम्ही या देशात काही भाडेकरू म्हणून राहत नाही. तर या देशात भागीदार आहोत. जर मोदी मंदिरांमध्ये जाऊ शकत असतील तर मुसलमानही मशिदीत जाऊ शकतात. तो आमचा संविधानिक अधिकार आहे.’ अल्पसंख्यांक धोक्यात येतील तेव्हा संविधानाच्या आधारे मुस्लिम बांधवांसाठी मी लढीन असा विश्वासही ओवेसींनी व्यक्त केला. या देशात कायम वंचित राहिलेल्या दलित आणि मुस्लिम या घटकांनी एकत्र येणं गरजेचं आहे असं मत यावेळी ओवेसी यांनी व्यक्त केलं आहे. ‘या देशातील दलित आणि मुसलमानांच्या अधिकारांसाठी एमआयएम कायम लढत राहील.’ दलित-मुस्लिम एकत्र आल्यामुळेच महाराष्ट्रातील औरंगाबाद या जागेवर एमआयएम विजयी झालं आहे असंही असदुद्दिन ओवेसींनी सांगितलं आहे. यावेळी भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांचा उल्लेख त्यांना मोठा भाऊ असा केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!