सेनेच्या कुठल्याही नेत्याने दुपारपर्यंत न बोलण्याचे उद्धव ठाकरे यांचे आदेश
लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्या दुपारी एकपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचे आदेश शिवसेनेकडून प्रवक्त्यांना देण्यात आले आहेत. आज शिवसेना भवनात प्रवक्त्यांची बैठक झाली. यावेळी उद्या दुपारी एकपर्यंत प्रसिद्धी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देण्याच्या सूचना शिवसेनेकडून प्रवक्त्यांना देण्यात आल्या. या बैठकीला खासदार संजय राऊत यांनी मार्गदर्शन केलं. एबीपी माझानं हे वृत्त दिलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान रविवारी (19 मे) पार पाडलं. यानंतर संध्याकाळी विविध वाहिन्यांचे एक्झिट पोल समोर आले. यातील जवळपास सर्वच पोल्सनी देशात एनडीएचं सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. याशिवाय राज्यातही शिवसेना-भाजपाला चांगलं यश मिळणार असल्याची शक्यता वर्तवली. मात्र तरीही शिवसेनेनं एक वाजेपर्यंत आपल्या प्रवक्त्यांना माध्यमांशी न बोलण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुपारपर्यंत मतमोजणीचा कल स्पष्ट होऊ शकतो. त्यामुळेच शिवसेनेकडून ही सूचना केली गेल्याची शक्यता आहे.