…गुंगीतही , तो आई , आई म्हणत होता पण आईच्या प्रियकराने त्याला पाण्यात ढकलून दिले !!
अनैतिक संबंधाला अडसर ठरणा-या दहा वर्षाच्या पोटच्या मुलाचा आई व तिच्या प्रियकराने संगनमत करून खून केल्याची घटना आज उघडकीस आली. गौरव उर्फ यश प्रकाश चव्हाण ,वय १० वर्षे असे खून झालेल्या दुर्देवी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी आई अश्विनी प्रकाश चव्हाण , वय. २९ वर्षे रा.वृंदावन कॉलनी, नावेचीवाडी, वाई आणि तिचा प्रियकर सचिन शिवराम कुंभार, वय ४१ वर्षे, रा.बावधन, ता.वाई यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
येथील नावेचीवाडीतील वृंदावन कॉलनी मधील गौरव उर्फ यश चव्हाण हा इयत्ता चौथीत शिकणारा मुलगा शुक्रवारी (ता.२८ एप्रिल) रात्री गंगापुरी यात्रेतील ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो घरी परत आला नाही. त्यामुळे पालकांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. त्यामुळे दुस-या दिवशी शनिवारी (ता.२९) सकाळी आई अश्विनी हिने वाई पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार मुलगा अल्पवयीन असल्याने अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केले असल्याचा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. दरम्यान त्याच दिवशी दुपारी चारच्या सुमारास देगावच्या हद्दीत जाधव वस्ती येथे धोम डाव्या कालव्यात एका मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना काही युवकांना आढळला. त्यांनी याबाबतची माहिती भुईंज पोलिसांना दिली. पोलिसांनी सदर मृतदेह पाण्यातून बाहेर काढून रितसर पंचनामा करून अकस्मात मयत म्हणून नोंद केली. तसेच याबाबतची माहिती वाई पोलिस ठाण्याला दिली. त्यानंतर गौरवच्या नातेवाईकांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करून मृतदेह ओळखला.
दरम्यान गौरव कसा बेपत्ता झाला याबाबत त्याच्या आईकडे कसून चौकशी केली असता त्यामध्ये विसंगती दिसून आली. त्यामुळे पोलीसांनी आई अश्विनी हिला विश्वासात घेतले. त्यावेळी तीने सत्यघटना कथन केली. अश्विनी चव्हाण व सचिन कुंभार दोघेही औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत नोकरीला होते. तेथे त्यांचे प्रेम संबंध जुळले. गेल्या दोन वर्षापासून त्यांचे अनैतिक संबंध होते. त्यातूनच हा खून झाल्याचे पोलीसांनी स्पष्ट केले.
अश्विनी मुलाला घेऊन कार्यक्रम पाहायला गेली होती. त्यावेळी सचिनचा फोन आल्याने दोघेही स्कूटीवरून शाहीर चौकात आले. त्यावेळी सचिनने मुलाला थम्पसप कोल्ड्रींगची बाटली दिली. ती घेतल्यानंतर तिघेही युनिकॉर्न मोटारसायकल वरून शेलारवाडी रस्त्याला धोम डाव्या कालव्याजवळ पोहचले. दुचाकीवरून उतरल्यानंतर गौरवला गुंगीमुळे चालता येत नव्हते. त्यावेळी अश्विनीने मुलाला बाटलीतून काय दिले असा जाब सचिनला विचारला. त्यावर सचिनने तुला आणि नव-यालाही मारून टाकीन अशी धमकी देत मुलाला कालव्यात ढकलून दिले. यावेळी मुलांने आईला हाक मारली परंतू अश्विनी काहीच करू शकली नाही. यावरून आई अश्विनी व प्रियकर सचिन या दोघांनी संगनमत करून गौरवचा खून केल्याचे उघडकीस झाल्याने आज दोघांनाही अटक करण्यात आली. त्यांना वाईच्या न्यायालयापुढे हजर केले. त्यावेळी न्यायालयाने दोघांनाही सोमवार (ता.१३) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला असल्याचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी सांगितले.
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्रसिंह निंबाळकर करीत आहेत. पोलीस उपअधीक्षक अजित टिके व पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक महेंद्रसिंह निंबाळकर, उपनिरीक्षक राजेंद्र कदम, शिवाजी जाधव, त्रिंबक अहिरेकर, कृष्णा पवार, प्रशांत शिंदे, सोमनाथ बल्लाळ, ओकार गरुड व हणमंत दडस आदीनी सदर गुन्हा उघडकीस आणला