शहीद करकरेंबद्दल साध्वी प्रज्ञा यांनी वादग्रस्त विधान करायला नको होते, त्यांच्या मतांशी भाजप सहमत नाही : मुख्यमंत्री
मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबाबत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने केलेल्या वादग्रस्त विधानावरून उठलेले वादळ अजून शमले नसताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘शहीद करकरेंबद्दल साध्वी प्रज्ञा यांनी असे वादग्रस्त विधान करायला नको होते’, असे मत व्यक्त केले आहे. इंदूर येथे फडणवीस पत्रकारांशी बोलत होते.
शहीद हेमंत करकरे यांनी कधीही ‘हिंदू दहशतवाद’ हा शब्दप्रयोग केला नव्हता तर सर्वात आधी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी हा उल्लेख केला. त्यानंतर तेव्हाचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि नंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्याची री ओढली, असा आरोप फडणवीस यांनी केला. केंद्र आणि राज्यातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने ‘व्होट बँके’च्या राजकारणासाठी हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा उभा केला होता.
अल्पसंख्यकांमध्ये सरकारविरोधात तेव्हा जो रोष होता, तो कमी करण्यासाठीच हे चित्र उभे करण्यात आले होते, अशी टीकाही फडणवीस यांनी केली . करकरेंबद्दल बोलायचे तर ते मायभूमीच्या रक्षणासाठी शहीद झाले असून भाजपने तशी भूमिका आधीच स्पष्ट केलेली आहे. साध्वी प्रज्ञा यांच्या विधानाशी सहमत नसल्याचे भाजपने स्पष्टपणे नमूद केले आहे. शिवाय प्रज्ञा यांनीही आपले विधान नंतर मागे घेतलेले आहे, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.