सिन्नर तालुक्यात कोवळी ज्वारी खाल्ल्यामुळे १७ गायी,४ म्हशींचा मृत्यू
कोवळ्या ज्वारीचे ताटे खाल्ल्याने विषबाधा होऊन १७ गायी आणि ४ म्हशी यांचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना सिन्नर तालुक्यातील कोमलवाडी येथे घडली आहे. कोमलवाडी शिवारात काठेवाडी गवळी लोक जनावरांचा कळप घेऊन फिरत होते.
या शिवारात एका शेतकऱ्याने ज्वारी कापून ठेवली होती. मध्यंतरी आलेल्या अवकाळी पावसामुळे कापलेल्या ज्वारीला पुन्हा ताटे फुटले होते. या फिरस्ती गवळी लोकांनी त्यांच्या जनावरांना ज्वारीत चारा खाऊ घालण्यासाठी सोडले. जनावरांनी ज्वारी खाल्ली परंतु, कोवळया ज्वारीमुळे जनावरांच्या तोंडातून फेस येणे सुरू झाले. या प्रकारामुळे १४ गायी आणि ४ म्हशींचा मृत्यू झाला. पशुधन विकास अधिकारी डॉ. अविनाश पवार यांनी या सगळ्या जनावरांचे शवविच्छेदन केले. विषबाधा झाल्यामुळेच या जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली.