Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

जिंकणार मीच , पण जावई प्रेमापोटी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे युती धर्म पाळला नाही : खा. चंद्रकांत खैरे यांची थेट भाजप -सेना नेतृत्वाकडे तक्रार

Spread the love

जावई प्रेमापोटी महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी उमेदवार जावई हर्षवर्धन जाधव यांच्याखातर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात युतीचा धर्म पाळला नसल्याची तक्रार शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांनी थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे केली आहे. या प्रकारामुळे भाजप-शिवसेना युतीमध्ये निवडणुकी दरम्यानच तणाव निर्माण झाल्याचे उघड झाले असून, त्याचे सर्वत्र राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.  तरीही आपण मोठ्या फरकाने विजयी होऊ, असा आत्मविश्वास खैरे यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तानुसार औरंगाबादमधील दानवे यांच्या असहकार्याची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचली असून, संघानेही या प्रकाराची गंभीर दखल घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे.  औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार व चार वेळा निवडून आलेले खासदार चंद्रकांत खैरे लढत असतानाही दानवे यांचे जावई व शिव स्वराज्य बहुजन पक्षाचे आमदार हर्षवर्धन जाधव हेही रिंगणात उतरले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष असूनही रावसाहेब दानवे आपल्या जावयाला आवरू  तर शकलेच नाही पण त्यांनी उलट जावयालाच मदत केल्याचा आरोप खा. चंद्रकांत खैरे यांनी केला. वास्तविक दानवे यांच्याविरुद्ध जालना लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आपण स्वतः पुढाकार घेऊन खोतकर यांना  बंडखोरीपासून परावृत्त केले. पण दानवे यांनी या सहकार्याची जाणीव ठेवून आपल्या जावयांना आवरले नाही.

खा . चंद्रकांत खैरे यांनी आरोप केला कि , ‘ऐन निवडणुकीच्या काळात औरंगाबादच्या रुग्णालयात उपचारांच्या निमित्ताने पाच-सहा दिवस मुक्काम केला आणि राजकीय भेटीगाठी घेत जाधव यांची बाजू घेतली. दानवे यांना खूष करण्यासाठी औरंगाबादच्या भाजपच्या ८ ते १० नगरसेवकांनीही आपल्याविरुद्ध हर्षवर्धन जाधव यांचे उघडपणे काम केले. जाधव यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आपल्याविरुद्ध प्रचार केला असून दानवे पाटील आणि त्यांचे जावई जाधव यांना आवरा,’ अशी तक्रार खैरे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटून केली होती. त्यावर शहा यांनी आपल्याला निश्चिंत राहण्याचे आश्वासन दिल्याचेही  खैरे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही खैरे हेच युतीचे उमेदवार असून, कुठल्याही अपक्ष उमेदवाराची दखल घेऊ नका, असे आवाहन करीत  आपल्या मतदारसंघात येऊन आक्रमकपणे प्रचार केला. तसेच वातावरण पूर्वपदावर आणण्यासाठी भरपूर मदतही केली,  भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रक काढून खैरे यांना मतदान करण्यासाठी आवाहन केले. परंतु जावयाच्या प्रेमापोटी खोतकर यांना उमेदवारी मागे घ्यायला लावून दानवे पाटील यांना केलेल्या मदतीची परतफेड अशा पद्धतीने केल्याबद्दल खैरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

उद्धव यांच्याकडेही तक्रार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेही खैरे यांनी तक्रार केली आहे. पंतप्रधान मोदी यांचेही  या प्रकाराकडे लक्ष वेधण्यात आले असून, संघानेही दखल घेतली आहे. बहुजन वंचित आघाडीचे इम्तियाझ जलील खैरे यांचे मुख्य प्रतिस्पर्धी असून, हर्षवर्धन जाधव यांच्या उमेदवारीमुळे खैरे यांना हमखास मिळणारी मराठा मते फुटली असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, आपण मोठ्या फरकाने विजयी होऊ, असा विश्वास खैरे यांनी व्यक्त केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!