साध्वी प्रज्ञाच्या वक्तव्याला महत्व द्यावे असे वाटत नाही , मी फक्त हेमंत करकरेंबद्दलच बोलेल, त्यांचं नाव अभिमानानंच घेतलं पाहिजे : जुई नवरे
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने शहीद हेमंत करकरें यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद देशभर उमटत असून यावर उलट सुलट प्रतिक्रिया येत असतानाच करकरे कुटुंबीयांची प्रतिक्रिया येणे अपेक्षित होते . शहीद हेमंत करकरे यांची कन्या जुई नवरे यांनी यावर बोलताना दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, हे आम्हाला वडिलांनी शिकवलं, असं सांगत हिंदुत्ववाद्यांना प्रत्युत्तर दिले आहे . आपल्या शापामुळेच करकरेंचा मृत्यू झाला, असे भोपाळमधून भाजपची उमेदवार असलेली साध्वी प्रज्ञासिंह म्हणाली होती . यावरून राजकारण तापलं आणि जननिंदेपासून वाचण्यासाठी या साध्वीला माफीही मागावी लागली पण संघ आणि भाजपने साध्वीला जाहीर पाठिंबा तर दिलाच पण संघानेही साध्वीच्या वक्तव्याचे समर्थनच केले . रामदेव बाबा याने तर साध्वीला तुरुंगात दिलेल्या वागणुकीमुळेच कर्क रोग झाल्याचे प्रतिपादन केले .
या सर्व पार्श्वभूमीवर जुई नवरे यांनी म्हटले आहे कि , दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, असं वडिलांनी आम्हाला शिकवलं. २४ वर्षांच्या सेवेत त्यांनी प्रत्येकाला मदत केली. अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी आपलं शहर आणि देश वाचविण्याचा प्रयत्न केला. आमच्याहून अधिक त्यांनी वर्दीलाच महत्त्व दिलं. प्रत्येकानं या गोष्टीचं स्मरण ठेवावं. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. त्यांना किंवा त्यांचं वक्तव्य महत्त्वाचं वाटत नाही. मी फक्त हेमंत करकरेंबद्दलच बोलेल. ते रोल मॉडेल होते आणि त्यांचं नाव अभिमानानंच घेतलं पाहिजे, असं आवाहन जुई नवरे यांनी केलं. वडिलांना पुस्तक वाचनाची आवड होती. चांगली पुस्तकं वाचण्यासाठी ते सतत प्रयत्न करत. आपल्या वर्दीनंतर त्यांचं दुसरं प्रेम मराठी पुस्तकांवर होतं. तसंच इंग्रजीसोबतच मराठीतही मुलांनी पारंगत व्हावं असं त्यांना वाटायचं. त्यांनी मोठ्या कष्टाने जीवन घडवलं. आपलं आयुष्य संघर्षमय आहे याची जाणीव त्यांना अखेरपर्यंत होती, असं जुई नवरे म्हणाल्या.