Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Loksabha first phase : अपवाद वगळता महाराष्ट्रात मतदान शांततेत , गडचिरोलीत ४ केंद्रांवर फेर मतदान : निवडणूक अयोग्य

Spread the love

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज रोजी झालेल्या मतदानात राज्यातील ७ मतदारसंघात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ५५.९७ टक्के मतदान झाले. सायंकाळी ६ नंतरही काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा असल्याने उशिरापर्यंत मतदान सुरु होतेअशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज येथे दिली. काही ठिकाणच्या अपवादात्मक घटना वगळता सर्व सात मतदारसंघांमध्ये शांततेत मतदान पार पडलेअसेही त्यांनी यावेळी सांगितले. मंत्रालयात आज रात्री झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, उप मुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यातील सात लोकसभा मतदारसंघात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे मतदान झाले. वर्धा ५५.३६ टक्के, रामटेक (अ.जा.) ५१.७२ टक्के,नागपूर ५३.१३ टक्के, भंडारा-गोंदिया ६०.५० टक्के, गडचिरोली-चिमूर (अ.ज.) ६१.३३ टक्के, चंद्रपूर ५५.९७ टक्के आणि यवतमाळ-वाशिम ५३.७८ टक्के.

कट्टर डावी विचारसरणीच्या कृत्यामुळे मतदान पथके पोहोचू न शकल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील वटेली, गर्देवाडा, गर्देवाडा (पुसकोठी),गर्देवाडा (वांगेतुरी) या ४ मतदान केंद्रांवर मतदान होऊ शकले नाही. या मतदान केंद्रांवर नंतर मतदान घेण्यात येणार आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील फुलसरगोंदी येथे छोटा बॉम्ब टाकण्याचा प्रकार झाला. यात दोन जवान जखमी झाले. या जवानांना तातडीने हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे आणून उपचारासाठी दाखल करण्यात आले. याशिवाय आणखी एका बेस कॅम्पजवळ फायरींगचा प्रकार झाला. अशा अपवादात्मक घटना वगळता सर्व सात मतदारसंघांमध्ये मतदान शांततेत पार पडले, असे श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.

पहिल्या टप्प्यात राज्यात १४ हजार ९१९ मतदान केंद्रे होती. त्यापैकी अत्यंत कमी म्हणजे १.५ टक्क्यांपेक्षा कमी मतदान केंद्रावर मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाडीच्या घटना घडल्या. या मतदान केंद्रांमध्ये लगेच काही वेळात मतदान यंत्रे बदलून तातडीने मतदान सुरु करण्यात आले. त्यामुळे यंत्रातील बिघाडामुळे मतदान प्रक्रियेत कोठेही खंड पडला नाही, असेही श्री.शिंदे यांनी सांगितले.

सर्व मतदारसंघांमध्ये मतदारांसाठी आवश्यक मुलभूत सुविधा पुरविण्यात आल्या. दिव्यांग मतदारांनाही मागणीनुसार व्हीलचेअररँप आदी सुविधा पुरविण्यात आल्या. याशिवाय १ हजार २६१ इतक्या मतदान केंद्रावरील कामकाजाचे लाईव्ह वेबकास्टींग करण्यात आले असल्याचीही माहिती श्री.शिंदे यांनी दिली.

राज्यात विविध कारवायांमध्ये आतापर्यंत १०४ कोटी १९ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. यामध्ये सुमारे ३५ कोटी रुपये रोकडसुमारे १९ कोटी १२ लाख रुपये इतक्या किंमतीची दारुसुमारे ५ कोटी ४६ लाख रुपयांचे अंमली पदार्थ तर ४४ कोटी ६१ लाख रुपये किंमतीचे दागिने ताब्यात घेण्यात आले आहेतअशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!