चिकनने घेतला आधी पत्नीचा जीव आणि नंतर पतीनेही घेतले विष…..
पतीला नवरात्रीत चिकन खाण्याचा मोह आवरला नाही त्यामुळे पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि धर्मभ्रष्ट झाला म्हणून पत्नीने विष घेऊन आत्महत्या केली आणि त्यानंतर पश्र्चातापदग्ध पतीनेही आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली.
ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील खिरी शहरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
उपलब्ध माहितीनुसार चैत्रातील नवरात्र उत्तर भारतात अत्यंत पवित्र मानले जातात. या नवरात्रात मांसाहार करणं वर्ज्य असतं. चैत्राच्या पहिल्या दिवशीपासून राम नवमीपर्यंत हे नवरात्र साजरे केले जातात.
अधिक माहिती अशी की, खिरी शहरात राहणारे आनंद विहारी वर्मा (५०) मंगळवारी रात्री मद्यपान करून घरी आले. त्यांनी आपली पत्नी फुलमती हिला चिकन बनवण्याचा आग्रह केला. पण नवरात्र सुरू असल्यामुळे चिकन बनवण्यास तिने नकार दिला. यावरून दोघांची वादावादी झाली आणि फुलमतीने विष खाऊन आत्महत्या केली. थोड्या वेळाने आनंद विहारी वर्मांना त्यांची चूक लक्षात आली. तेव्हा पश्चात्तापामुळे त्यांनीही विषाचे सेवन केले.
या सर्व प्रकरणात विष घेतल्यानंतर त्यांनी आपली कन्या शिनू हिला सगळा प्रकार फोनवर सांगितला. शिनूने लगेच या घटनेची माहिती काकांना दिली आणि वडिलांना वाचवायला सांगितलं. आनंद विहारी वर्मा यांच्या भावाने तडक त्यांना रुग्णालयात दाखल केलं. तेथे उपचारादरम्यान आनंद विहारी वर्मांचा मृत्यू झाला.