बेजबाबदारपणाचा कळस : जेंव्हा नरेंद्र मोदी “फर्स्ट वोटर्स”ना पुलवामा आणि बालाकोटच्या नावाने “कमळा”ला मते मागतात !!
पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवमतदारांनी पहिलं मत बालाकोटमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैनिकांना समर्पित करावं, असं आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिकांच्या नावाने मतं मागितली आहेत. एकीकडे निवडणूक आयोगाने सैन्याचा फोटो किंवा त्यांच्या उल्लेख प्रचारात टाळण्याचे आवाहन करत असताना, थेट देशाच्या पंतप्रधानांनीच निवडणूक आयोगाच्या आवाहनाला चक्क नजर अंदाज केले आहे. बहुदा मतांसाठी इतके लाचार होणारे हे पहिलेच पंतप्रधान असावेत . लातुरातील औसा येथे शिवसेना-भाजप युतीची प्रचारसभा पार पडली. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संबोधित केले.
काय म्हणाले नरेंद्र मोदी ?
“पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना मी आवाहन करतो की, तुम्ही तुमचं पहिलं मत बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करणाऱ्या वीर जवानांसाठी समर्पित करु शकता ना? तुम्ही तुमचं पहिलं मतदान पुलवामात शहीद झालेल्या वीर जवानांसाठी समर्पित करु शकता ना?” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिकांच्या नावे मतांचा जोगवा मागितला आहे. तसेच, पहिलं मत देशासाठी द्या, पहिलं मत देश कणखर करण्यासाठी द्या, पहिलं मत देशात कणखर सरकार बनवण्यासाठी द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आपले पहिले मत देशाला द्या, देशाला द्या म्हणत शेवटी ते कमळावर आले….आणि आदर्श आचारसंहितेची स्वतः पंतप्रधानानेच जाहीर सभेत अक्षरशः वाट लावली.
चित्रदुर्गच्या सभेतही तोच विषय…
बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राइकचा उल्लेख लातूर नंतर पुढे कर्नाटकात चित्रदुर्ग येथेही कंटिन्यू केला . या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामीयांच्यावर शरसंधान साधले. तुमची व्होट बँक भारतात आहे की पाकिस्तानात?, असा सवाल मोदींनी उपस्थित केला.
‘पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना मारल्यानं भारतातल्या काहींना दु:ख होत आहे. इथले मुख्यमंत्री तर आणखी एक पाऊल पुढे गेले. आपल्या सैन्याच्या शौर्याबद्दल बोलायचं नाही, असं त्यांना वाटत नाही. त्यामुळे त्यांच्या व्होट बँकेला धक्का लागतो. मला त्यांना विचारावंसं वाटतं, तुमची व्होट बँक भारतात आहे की पाकिस्तानात?,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी कुमारस्वामींचा समाचार घेतला. भाजपचे नेते आणि खोटे बोलणे हे आपण समजू शकतो पण देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अशी वक्तव्ये नक्कीच अशोभनीय आहेत. पण या माणसाला कोण सांगणार?