राजच्या दणक्याने भाजप बॅकफुटवर , तरुण मतदारांना राजप्रहार घालणार मोहिनी
गेल्या दोन भाषणात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध भूमिका घेतली असल्याने राजच्या दणक्याने भाजप बॅकफुटवर जात असल्याचे चित्र असून , तरुण मतदारांना “राजप्रहार” मोहिनी घालणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे . राज ठाकरे यांना आपल्या लोकसभा निवडणुकीच्या मर्यादा लक्षात आल्याने त्यांनी निवडणूक न लढविता काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला मदत करण्याचा निर्णय घेतला असल्याने त्यांच्या या भूमिकेची चांगलीच चर्चा होत आहे .
जुन्याच वळणावर नेत्यांची भाषणे होत असल्याने जाहीर सभांमध्ये राज ठाकरे पॉवर पॉईंटचा आधार घेऊन मुद्देसूद भाषणे करीत असल्याने त्यांनी उपस्थित केलेल्या कुठल्याही प्रश्नांचे उत्तर देण्याचे धाडस ना देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आहे ना कुठल्या इतर नेत्यांमध्ये !! त्यांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला जात आहे तो खूपच सुमार दर्जाचा आहे . जसे विनोद तावडेंनी त्यांच्यावर केलेली स्क्रिप्ट विषयक टीका खुपच रटाळ आहे . खरे तर महाराष्ट्राच्या राजकीय पडद्यावरील ” राज ठाकरे ” हा नवा सिनेमा असा आहे कि , ज्याचे दिग्दर्शक , लेखक , निर्माता , अभिनेता स्वतःच आहेत हे विनोद तावडे यांना कळू नये , हाच मोठा ” विनोद ” आहे .
मुळात राज ठाकरे यांच्या एकही प्रश्नाचे उत्तर भाजप देऊ शकत नाहीत . कारण हे प्रश्न नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे वस्त्रहरण करणारे आहेत . राज ठाकरेंनी शनिवारी झालेल्या मेळाव्यात राज यांनी मोदींचा कथित खोटेपणा पुराव्यानिशी माध्यमांसमोर मांडला. त्यामुळे मोदींची प्रतिमा महाराष्ट्रात खराब होण्याची शक्यता आहे. त्याचाच परिणाम म्हणून कि काय , मोदींची बारामती येथे १० एप्रिल रोजी होऊ घातलेली जाहीर सभा लांबवण्यात आली आहे असे बोलले जात आहे . खरे तर या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता मोदींची सभा पुढच्या टप्प्यात नेमकी होईल कि नाही कोणीही सांगू शकत नाही. कारण पवारांच्या बारामतीत कोणाचीही सभा रंगतदार होणे सहज शक्य नाही हेच खरे.
आपल्या प्रत्येक प्रचार सभेत पंतप्रधान मोदी सैन्याचा पराक्रम आणि मी सैन्याला दिलेले अधिकार याविषयी सांगत असतात. राज ठाकरे यांनी हाच धागा पकडून काश्मीरमध्ये मोदींनी दिलेल्या भाषणांची क्लिप सर्वांना ऐकवली. त्यात, मीच पाकिस्तानवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे मोदी काश्मीरमधील सभेत सांगताना दिसत होते. त्यामुळे मोदी खोट बोलत असल्याचे स्पष्ट झाले. दुसरी बाब म्हणजे, मोदींच्या बीफ निर्यातीवरील भूमिकेसंदर्भातील क्लिप राज यांनी सर्वांना ऐकवली. त्यामुळे मोदींचा दुटप्पीपणा समोर आल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
दरम्यान राज यांच्या भाषणांचे महाराष्ट्रातील अनेक वृत्तवाहिन्यांनी थेट प्रक्षेपण केले होते. त्यामुळे यांच्याविरोधातील अनेक मुद्दे घराघरात पोहोचले आहे. त्यामुळे मोदी महाराष्ट्रात सभा घेण्यास आल्यास, जनतेकडून राज यांनी उपस्थिती केलेले प्रश्न पुन्हा विचारले जाऊ शकतात, अशी शक्यता आहे. नाही म्हटले तरी राज यांनी प्रवृत्त केले आहे एवढे मात्र खरे.