Rahul Challenge : मोदींनी केवळ पाच मिनिटे रायफल पकडून उभे राहून दाखवावे किंवा जम्मू-काश्मिरात बसमधून एकटे फिरून दाखवावे !!
पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाईदलाने पाकिस्तानात घुसून बॉम्बहल्ला केला. हे शौर्य आपल्या धाडसी जवानांनी गाजवले असताना पंतप्रधान मोदी मात्र हे हल्ले मी घडवून आणलेत असे सांगत सुटले आहेत, असे नमूद करताना मोदींनी केवळ पाच मिनिटं रायफल पकडून उभं राहून दाखवावं, जम्मू-काश्मिरात बसमधून एकटं फिरून दाखवावं, असं आव्हानच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज दिलं.
राहुल गांधी यांनी चंद्रपूर आणि वर्धा येथील जाहीर सभांमधून हिंदू धर्मातील परंपरा आणि हिंदुत्वावरूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. हिंदू धर्मात गुरूला विशेष महत्त्व आहे. गुरू-शिष्य यांच्यात एक आदराचं नातं असतं, असं नमूद करत अडवाणींना भाजपमध्ये मिळत असलेल्या वागणुकीवरून राहुल यांनी मोदींना लक्ष्य केले.
‘अडवाणी मोदींचे गुरू आहेत मात्र हा शिष्य कधी अडवाणींना नमस्कार करत नाही. उलट गुरुला व्यासपीठावरून खाली उतरवलं जातं. त्याला चपला मारल्या जातात. अशा शिष्याने हिंदू धर्माच्या बाता का माराव्यात?, असा सवाल राहुल यांनी केला. ही निवडणूक दोन विचारधारांची आहे. काँग्रेसची विचारधारा प्रेम आणि बंधुभाव सांगणारी आहे तर मोदींची विचारधारा द्वेष, राग आणि दुफळी माजवणारी आहे. त्यावर आम्ही नक्कीच मात करू असा विश्वास राहुल यांनी व्यक्त केला. द्वेष पसरवा, निष्पाप लोकांवर हल्ले करा, हिंसाचार माजवा असे हिंदू धर्मात कुठेही लिहिलेले नाही. हिंदू धर्म प्रेम आणि बंधुत्वाची शिक्षण देतो. प्रत्येक हिंदूच्या ‘डिएनए’मध्ये हा बंधुभाव आहे आणि त्याच्या जोरावरच आपल्याला ही लढाई जिंकायची आहे, असे आवाहनही राहुल यांनी केले.